
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारात मुस्लिम आरक्षण हा कळीचा मुद्दा बनला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह वेगवेगळे राष्ट्रीय नेते यावर आपापल्या भूमिका मांडत आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावरून वादही चालू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाला संदेश दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी मुस्लिम आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली. मोदी म्हणाले, संविधान सभेत देशातील अनेक विचारवंत आणि मान्यवर बसले होते.
तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपाचा एकही सदस्य नव्हता. तिथे सर्व पंथांचे लोक उपस्थित होते. या सर्व लोकांनी प्रदीर्घ चर्चा करून निर्णय घेतला की, भारतासारख्या देशात धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास देशाचं खूप नुकसान होईल. त्याचवेळी त्यांनी समाजातील अस्पृश्यता, जातीवर आधारित भेदभाव आणि अशाच विकृती दूर करण्यासाठी दलितांना, आदिवासांनी आरक्षण दिलं पाहिजे असा निर्णय घेतला.नरेंद्र मोदी म्हणाले,
“केवळ दलित आणि आदिवासींना आरक्षण देणं म्हणजे मुस्लिम समुदायाला कुठलाही लाभ मिळणार नाही असं नाही. आमच्या भाजपा सरकारने सामान्य जातींना १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यामध्ये मुस्लिम समुदायातील गरीबदेखील समाविष्ट आहे. तेदेखील सरकारी योजनांचे वाटेकरी आहेत. आम्ही कोणाचेही अधिकार हिरावत नाही आहोत.
आम्ही केवळ आरक्षणासाठी धर्माचा आधार घेण्यास विरोध करत आहोत. या देशातील गरीब व्यक्ती जी हिंदू असेल, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा पारसी यापैकी कुठल्याही धर्माची असली तरी त्यांना सर्व फायदे मिळतील.” टाईन्म नाऊला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी मुस्लिम समुदाय, त्यांचं आरक्षण, मुस्लिम मतदारांबाबत रोखठोक भूमिका मांडली.