
अहिल्यानगर / नाशिक :
नेवासा तालुक्यातील भूमिअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचे जाळे उघडे पाडत भुकरमापक (वर्ग 3) अजयभानसिंग गुलावसिंग परदेशी (वय 48) यांना दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकने रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे भूमिअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट उसळली आहे.
शिवार रस्त्याची लढाई… आणि वाढता भ्रष्टाचार
पाथरवाला-गोयगव्हाण शिवारातील शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठीचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला होता. 2022 पासून ही लढाई न्यायालयापर्यंत पोहोचली.
उच्च न्यायालयाने मोजणी शेतकऱ्यांकडून फी न घेता शासनाने करावी, असा स्पष्ट आदेश दिला.
त्यामुळे 2023 मध्ये रस्ता खुला झाला.
परंतु मार्च 2025 मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर होताच काहीजणांनी पुन्हा गैरमार्गाने खुणा बदलून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
मोजणी ‘ठरवून’ करण्यासाठी दिड लाखांची मागणी
30 जून 2025 रोजी तक्रारदारांच्या भावाने भूमिअभिलेख कार्यालय नेवासा येथे दुरुस्ती अर्ज केला असता,
भुकरमापक अजय परदेशी यांनी स्वतःच्या प्रभावाचा वापर करून मोजणी अधिकारी जयदीप गाढे यांच्याकडून पूर्ववत रस्ता मोकळा दाखविण्यासाठी दिड लाखांची लाच मागितली.
सरळ सांगितले —
“काम करून देतो… पण दिड लाख रुपये लागतील!”
सरकारी पदाचा गैरवापर करत शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता ‘विक्रीस’ काढण्याचा हा प्रकार तक्रारदारांनी थेट लाचलुचपत विभागाकडे दिला.
धडाकेबाज सापळा – परदेशी रंगेहात जाळ्यात
लाचलुचपत विभागाने काटेकोर सापळा रचला.
4 डिसेंबर 2025 रोजी परदेशी यांनी तक्रारदाराकडून दिड लाखांची लाच स्वीकारताच
पंचांसमक्ष त्यांना हिरहिरीत नोटांसह रंगेहात पकडण्यात आले.
नेवासा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल.
कारवाई करणारे अधिकारी : कठोर पथकाची धडाडी
सापळा अधिकारी : PI राहुलकुमार नाईक, लाचलुचपत विभाग, नाशिक
पथक : पो.ह.वा. प्रफुल्ल माळी, पो.हा. विलास निकम, ना.पो.ह.वा. विनोद पवार
तपास अधिकारी : PI राजू आल्हाट, लाचलुचपत विभाग, अहिल्यानगर
वरिष्ठांचे मार्गदर्शन :
मा. श्री भारत तांगडे, SP, LCB नाशिक
मा. श्री माधव रेड्डी, अपर SP, नाशिक
मा. श्री सुनील दोरगे, अपर SP, नाशिक
नागरिकांसाठी कडक संदेश
या कारवाईने भूमिअभिलेख विभागातील वाढता भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारा अधिकारी तुरुंगात धाडण्यात आल्यामुळे नागरिकांनी लाच मागितल्यास निडरपणे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.
ही कारवाई नेवासा तालुक्यातील भूमिअभिलेखातील भ्रष्ट जाळ्याला जबरदस्त धक्का देणारी ठरली असून, शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला मोठे यश मानले जात आहे.

