
[16:45, 21/6/2026] ………..: शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी येथे साई संस्थानच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर महिला भाविकेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर हा मोर्चा आक्रमक ठरला.
मोर्चादरम्यान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांबाबत कठोर भूमिका मांडली.
दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर आता शिर्डी आणि परिसरात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राहाता येथील मुलीची छेड काढणाऱ्या गायकवाड या आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई झाल्याचा दाखला देत काही जागरूक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, शिर्डीतील महिला भाविकेशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या आणि वाळकी येथील रहिवासी असलेल्या साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्याबाबत पुढे काय कारवाई होणार?
महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सर्वांसाठी समान निकष असावेत. एकाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे निकष का लावले जातात, असा सवालही काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, साई संस्थान प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला सेवेतून निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून पुढील कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार होणार आहे.
मात्र, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोर्चातील भाषणातून व्यक्त केलेल्या कठोर भूमिकेनंतर आता वाळकी येथील आरोपीविरोधात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
: “माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहता येथील प्रकरणात कठोर भूमिका घेत आपले शब्द खरे ठरवले. त्याच धर्तीवर, शिर्डीत महिला भाविकेशी गैरवर्तन प्रकरणातील आरोपीविरोधातही कठोर कारवाई करण्यात यावी. त्याच्या राहत असलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करून घर जमीनदोस्त करावे,” अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सर्वांसाठी समान निकष लागू करावेत, अशीही भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

