
श्री साईबाबा संस्थानच्या दर्शन रांगेत कर्तव्य बजावत असताना प्रामाणिकतेचा प्रेरणादायी आदर्श समोर आला आहे. सुरक्षा कर्मचारी श्री रवींद्र भास्कर खरात यांना नवीन दर्शन रांगेत अंदाजे 2.450 ग्रॅम वजनाची, सुमारे ₹37,000 किंमतीची सोन्याची अंगठी सापडली. त्यांनी कोणताही मोह न बाळगता ही मौल्यवान वस्तू तत्काळ संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
तसेच, एन.एस.एस. एजन्सीचे आरोग्य कर्मचारी श्री अनिकेत शशिकांत तुपे यांनाही दर्शन रांगेत ₹2,840 रोख रक्कम सापडली. त्यांनीही प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत ही रक्कम प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केली.

दोन्ही कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे साईनगरीत ईमानदारीचा आदर्श निर्माण झाला असून भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. “साईंच्या नगरीत अजूनही प्रामाणिकपणा जिवंत आहे,” अशी भावना यामुळे व्यक्त होत आहे.
सदर घटनेमुळे श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 🙏

