शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरातील कालिकानगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका तरुणाला मित्रिणीचा पत्ता विचारण्याच्या कारणावरून तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी दुसऱ्या नागरिकाची घरासमोर उभी असलेली स्कुटी पेटवून देत दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष उर्फ शक्या शंकर शिंदे (वय ३३, व्यवसाय रिक्षाचालक, रा. कालिकानगर, बाजारतळ, शिर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते घरासमोर उभे असताना आरोपी रोहित सुखदेव कापसे व करण आव्हाड हे तेथे आले. रोहित कापसे याने “माझी मैत्रीण प्रज्ञा तुझ्या घरी आली आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादीने ती आपल्या घरी नसल्याचे सांगितल्याने आरोपी संतापला.
रागाच्या भरात रोहित कापसे याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून करंगळी व शेजारील बोटाला गंभीर दुखापत केली. तसेच “तुला बघून घेतो” अशी जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी करण आव्हाड यानेही शिवीगाळ करून साथ दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेदरम्यान फिर्यादीने आरोपीच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून सौंदडीबाबा मंदिर परिसराकडे गेले. तेथे साईनाथ आण्णासाहेब दिवे यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच-१७ डीएच-०६०६ क्रमांकाची सुझुकी अॅक्सेस १२५ स्कुटी पेटवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
जखमी संतोष शिंदे यांनी राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
शिर्डी पोलिसांनी आरोपी रोहित सुखदेव कापसे व करण आव्हाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलमे 115(2), 118(1), 326(f), 351(2), 352, 3(5) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
: शिर्डीत वाढती दहशत चिंतेचा विषय
शिर्डीसारख्या जागतिक तीर्थक्षेत्रात भररस्त्यात तलवारीने हल्ला करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे आणि त्यानंतर वाहन जाळून दहशत निर्माण करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

