शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह विधाने करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गौतम खट्टर यांनी अखेर राहाता न्यायालयात हजर राहत आपल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य केली आहे. न्यायालयासमोर त्यांनी स्पष्टपणे कबुली देत, “श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत असलेले माझे सर्व गैरसमज दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही,” अशी लेखी ग्वाही दिली.
सन २०२३ मध्ये श्री साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे देशभरातील साईभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्री साईबाबा संस्थानने राहाता न्यायालयात अजय गौतम व गौतम खट्टर यांच्याविरोधात कायदेशीर दावा दाखल केला होता.
या प्रकरणातील अजय गौतम यांनी यापूर्वीच नोव्हेंबर २०२५ मध्ये न्यायालयात माफीनामा सादर करून आपली चूक मान्य केली होती. त्यानंतर आता गौतम खट्टर यांनीही न्यायालयात आपले पूर्वीचे विधान अपुऱ्या माहितीवर व गैरसमजाच्या आधारावर केल्याची कबुली देत माघार घेतली आहे.
राहाता येथे आयोजित पत्रकार परिषदेतही गौतम खट्टर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकपणे खेद व्यक्त केला. श्री साईबाबांविषयी चुकीची माहिती मिळाल्यामुळे आपण असे विधान केले होते, मात्र वस्तुस्थिती समजल्यानंतर आपले गैरसमज दूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त मोहन जयकर, विधी अधिकारी गोरक्षनाथ नलगे तसेच राहाता न्यायालयाचे वकील अॅड. राजेश नाईक यांनी महत्त्वाची समन्वयक भूमिका बजावली.
गौतम खट्टर यांच्या न्यायालयीन कबुलीमुळे श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानविषयी बिनबुडाचे आरोप व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत उत्तर दिले जाऊ शकते, असा स्पष्ट संदेश या प्रकरणातून गेल्याची भावना साईभक्तांमध्ये व्यक्त होत आहे.
श्री साईबाबा हे देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे श्री साईबाबा किंवा श्री साईबाबा संस्थानची बदनामी होईल, समाजात संभ्रम निर्माण होईल अथवा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावतील, अशा प्रकारचे बिनबुडाचे, दिशाभूल करणारे किंवा आक्षेपार्ह वक्तव्य कोणत्याही व्यक्तीने समाजमाध्यमे, यूट्यूब, मुलाखती किंवा इतर कोणत्याही माध्यमातून करू नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली असत्य माहिती पसरविण्याचा किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही.
यापुढे अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. न्यायालयीन लढा उभा करण्यासही संस्थान मागे हटणार नाही. श्री साईबाबांची प्रतिमा आणि कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी संस्थान कटिबद्ध आहे.”
— गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी
