शिर्डी : शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आवाज उठविणाऱ्या व्यक्तींना धमकावण्याची भाषा वापरली जात असेल, तर ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे. मंत्र्यांच्या मुलाने जाहीर सभेत विरोधकांचा ‘बंदोबस्त’ करण्याची भाषा केल्याचा दावा करत, “मंत्रीपद जनतेची सेवा करण्यासाठी आहे; गुंडगिरीची भाषा करण्यासाठी नाही,” असा थेट इशाराच पिपाडा यांनी दिला आहे.
शिर्डी–अहिल्यानगर मार्गाची दुरवस्था, जीवघेणे खड्डे, निकृष्ट काम आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याबाबत आपण सातत्याने तक्रारी करून आवाज उठवत आहोत. मात्र, जनतेच्या प्रश्नांवर बोलल्यामुळेच जर सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून ‘बंदोबस्त’ करण्याची भाषा केली जात असेल, तर सत्याचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे डॉ. पिपाडा यांनी म्हटले आहे.
‘विरोधकांना नेपाळमध्ये पाठवा’ वक्तव्यावर संताप
नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवरही संवेदनशीलता अपेक्षित असताना, संबंधित मंत्र्यांच्या मुलाने जाहीर सभेत विरोधकांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा पिपाडा यांनी केला आहे. “काही लोकांना नेपाळमध्ये पाठवा, त्यांना परत आणू नका,” अशा आशयाची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला.
“हजारो लोक पुराच्या संकटात सापडले असताना अशा प्रकारची भाषा वापरणे ही संवेदनशीलतेची परिसीमा आहे. विरोधक असतील म्हणून त्यांच्याबद्दल एवढी द्वेषाची भावना का?” असा सवालही पिपाडा यांनी उपस्थित केला.
‘वडील मंत्री आहेत म्हणून कोणाचे काही वाकडे करू शकत नाही’ हा भ्रम धोकादायक
मंत्रीपद हे जनतेने दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता दिली आहे; विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी किंवा गुंडगिरीची भाषा करण्यासाठी नाही, असे पिपाडा यांनी सुनावले.
“वडील मंत्री आहेत म्हणून आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही,” अशी मानसिकता सत्तेत असलेल्या कुणाच्याही अंगी बाणणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा
सत्य बोलणाऱ्याचा आवाज दाबण्यासाठी गुंडांना हाताशी धरल्याचा आरोप करत, हा प्रकार थांबविण्याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांची आहे, असेही डॉ. पिपाडा यांनी स्पष्ट केले.
“मंत्र्यांनी आपल्या मुलाला आवर घालावा. सत्ता कायमची नसते; जनतेचा दरबार सर्वांत मोठा असतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनतेचे हाल होत असताना प्रश्न विचारणाऱ्यांना धमकावण्याऐवजी रस्ते दुरुस्त करा,” असा घणाघात पिपाडा यांनी केला.
डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून हे आरोप करण्यात आले आहेत.