
शिर्डी | प्रतिनिधी
देश-विदेशातून लाखो भाविक ज्या साईनगरीत श्रद्धेने येतात, त्याच शिर्डीत भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. बसस्थानक, साई मंदिर परिसर, नगर परिषद पाण्याची टाकी, साईनाथ रुग्णालय, नगर-मनमाड महामार्ग, एक नंबर व पाच नंबर गेट परिसर आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना लक्ष्य करून अल्पवयीन मुलांच्या कथित ‘चिल्लर गँग’कडून चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत १५ ते २० मुलांचा गट शहरात फिरत असल्याची चर्चा आहे. या गटातील काही जण परिसरावर लक्ष ठेवतात, काही जण झोपलेल्या भाविकांच्या पिशव्यांची चैन उघडतात, तर इतर जण मोबाईल, पाकीट आणि रोख रक्कम घेऊन क्षणात पसार होतात. चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत आरोपी दूर निघून गेलेले असतात.
या मुलांपैकी काही जण व्हाइटनर, दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी गेल्याची माहिती स्थानिकांकडून सांगितली जात आहे. मंदिर सुरक्षा विभागाने अशा मुलांबाबत वेळोवेळी शिर्डी पोलिसांना माहिती दिल्याची चर्चा असून, काही संशयित मुलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचेही सांगितले जाते. मात्र या बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
विशेष म्हणजे, साईबाबा मंदिर परिसर आणि शहरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असतानाही चोरीच्या तक्रारी कमी होत नसल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दर्शनासाठी आलेले अनेक भाविक रात्री उशिरा बसस्थानक, मंदिर परिसर किंवा रस्त्याच्या कडेला विश्रांती घेतात आणि हाच क्षण साधून चोरी होत असल्याची तक्रार आहे.
काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, चोरी करताना प्रतिकार झाल्यास संशयित मुलांकडून धारदार वस्तू दाखवून धमकावल्याच्याही चर्चा आहेत. या दाव्यांचीही अधिकृत पुष्टी झालेली नसून, त्याची सत्यता तपासातून स्पष्ट होईल.
शिर्डी हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. रात्रीची गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही फुटेजचे नियमित विश्लेषण करणे आणि अशा घटनांवर तातडीने कारवाई करणे, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून जोर धरत आहे.
चौकट : आता काय करणार शिर्डी पोलीस?
बसस्थानक व मंदिर परिसरात रात्रगस्त वाढविणार का?
सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेणार का?
भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक नेमणार का?
वारंवार होणाऱ्या चोरीच्या तक्रारींना आळा बसणार का?
शिर्डीत श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित दर्शनाचा हक्क आहे. त्या विश्वासाला धक्का बसणार नाही, यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याची वेळ आता आली आहे.
‘चिल्लर गँग’ची कार्यपद्धती
शिर्डीत सक्रिय असल्याची चर्चा असलेल्या अल्पवयीन मुलांच्या कथित ‘चिल्लर गँग’ची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. दिवसभर विविध व्यसनांच्या आहारी गेलेली ही मुले इमारतींच्या गच्चीवर, ओस पडलेल्या जागांवर किंवा हॉटेल परिसरात वेळ घालवतात. रात्री उशिरा बसस्थानक, मंदिर परिसर आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांवर त्यांची नजर असते.
दोन मुले झोपलेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊन झोपतात. त्यानंतर योग्य संधी साधून खिशातील रोख रक्कम, मोबाईल किंवा पिशवी घेऊन क्षणार्धात पसार होतात, असा आरोप आहे. पकडले गेल्यास किंवा प्रतिकार झाल्यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून पळ काढण्याचाही प्रयत्न केल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या दाव्यांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.
माझ्या पोटाला चाकू लावला; जीव वाचवण्यासाठी आरोपीला सोडून दिले” — पीडित भाविक
“मी अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथून माझ्या वडिलांना उपचारासाठी ४ जुलै रोजी शिर्डीत घेऊन आलो होतो. त्यांना साईनाथ रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्रभर जागाच होतो. पहाटे नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ झोपलो असताना दोन मुलांनी माझ्या खिशातून एक हजार रुपये रोख आणि मोबाईल चोरला. मला जाग आल्यानंतर मी एका मुलाला पकडले. मात्र, त्याला सोडत नसल्याचे पाहून दुसऱ्या मुलाने माझ्या पोटाला चाकू लावला. जीवाच्या भीतीने मला त्याला सोडून द्यावे लागले,” अशी आपबिती पीडित भाविक संजय भीमराव पांढरे यांनी सांगितली.
(सदर माहिती पीडित भाविकाने केलेल्या दाव्यावर आधारित असून, संबंधित प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.)

