शिर्डी | प्रतिनिधी
साईनगरी शिर्डीत अन्नभेसळीविरोधात मोठी मोहीम राबवत अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध पेढा उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी तसेच मिठाई विक्रीच्या दुकानांवर धडक कारवाई केली. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या धाडसत्रात संशयित व निकृष्ट दर्जाचा हजारो किलो खाद्यसाठा जप्त करण्यात आल्याने मिठाई व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांना विकल्या जाणाऱ्या पेढे व मिठाईच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाने शहरातील विविध पेढा फॅक्टरी व मिठाई दुकानांवर अचानक छापेमारी केली.
या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पेढे, दूधजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच इतर खाद्य साहित्य ताब्यात घेण्यात आले. संबंधित साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही शिर्डीतील काही पेढा उत्पादकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा शहरातील तब्बल आठ ते दहा ठिकाणी धाड टाकत मोठ्या प्रमाणावर माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी राजेश बढ़े यांनी दैनिक साईदर्शनशी संवाद साधताना सांगितले की, “आज विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली असून जप्त केलेल्या पेढे व इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
या धाडसत्रामुळे शिर्डीतील मिठाई व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

