शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थानमध्ये वाढत्या शिस्तभंगाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संस्थानमध्ये कायमस्वरूपी, कंत्राटी, सुरक्षा रक्षक तसेच बाह्य ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी आता गणवेश, ओळखपत्र आणि शिस्तबद्ध वेशभूषा अनिवार्य करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
संस्थान प्रशासनाच्या पाहणीत अनेक कर्मचारी ड्युटीवर असतानाही गणवेशाशिवाय फिरत असल्याचे, गळ्यात किंवा हातात विविध प्रकारचे धागे, कडे, धार्मिक वस्तू परिधान करत असल्याचे तसेच ओळखपत्र न लावता काम करत असल्याचे निदर्शनास आले. काही कर्मचारी वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, विचित्र हेअर स्टाईल, कानात बाळी व इतर अलंकार घालून कामावर येत असल्याचेही समोर आले आहे.
यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या लाखो साईभक्तांना कर्मचारी आणि सामान्य व्यक्ती यामधील फरक ओळखणे कठीण होत होते. अनेक वेळा भाविकांना योग्य माहिती, मार्गदर्शन किंवा मदत मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गोरक्ष गाडीलकर यांनी थेट हस्तक्षेप करत शिस्तीबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे.
गणवेश आणि ओळखपत्राशिवाय ड्युटी नाही
नवीन आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी ड्युटीदरम्यान अधिकृत गणवेश परिधान करणे आणि ओळखपत्र स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे गणवेशाशिवाय अथवा ओळखपत्राशिवाय ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरशिस्तीची नोंद केली जाणार आहे.
विचित्र हेअर स्टाईल, बाळी आणि अलंकारांवर बंदी
संस्थान हे धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रद्धास्थान असल्याने कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत वेशभूषेतच कामावर उपस्थित राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाढलेली दाढी, अनावश्यक केस, फॅशन म्हणून केलेल्या विचित्र केशरचना, कानातील बाळी, अनावश्यक अलंकार यांना प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे.
दक्षता पथकाकडून अचानक तपासण्या
फक्त आदेश काढून थांबण्याऐवजी त्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी संस्थानच्या दक्षता पथकाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. विविध विभागांमध्ये अचानक राऊंड घेऊन तपासणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावानिशी नोंद केली जाणार आहे. त्याचा अहवाल थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे.
“साईभक्तांची सेवा प्रथम, मनमानी नंतर”
संस्थानमध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा साईबाबा संस्थानचा चेहरा मानला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ओळख स्पष्ट असणे, त्यांची वर्तणूक शिस्तबद्ध असणे आणि भाविकांना सहज मदत मिळणे आवश्यक आहे. संस्थानमध्ये वैयक्तिक मनमानी, निष्काळजीपणा किंवा शिस्तभंग खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून संस्थानच्या कामकाजात पारदर्शकता, जबाबदारी आणि शिस्त आणण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संस्थान प्रशासनात खळबळ उडाली असून कर्मचारी वर्गातही शिस्तीबाबत गंभीरता वाढल्याचे दिसून येत आहे.

