
अहिल्यानगर, दि. १६ : जिल्ह्यातील सर्वधर्मीय सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याची गौरवशाली परंपरा कायम राखत यंदाचा मोहरम सणही सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी टिपरसे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुदगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.
मोहरम मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गांची दुरुस्ती, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, जीर्ण व लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरुस्ती तसेच अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या. कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मिरवणूक मार्गावरील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि फलक तातडीने हटविणे, धोकादायक इमारतींची तपासणी करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथके, स्वच्छता सुविधा आणि फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला.
=
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी मोहरम सणादरम्यान जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी अफवा आणि समाज माध्यमांवरील अपप्रचाराला बळी न पडता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वांनी जबाबदारीने वागत शांतता आणि बंधुभावाचे वातावरण कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत विविध समाज प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना व मागण्यांवर संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले.
