

शिर्डी प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसंदर्भात शिर्डी येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सेवानिवृत्त निवडणूक उपायुक्त Avinash Sanas यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात विधानसभा व लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आणि त्यासाठी आतापासूनच संघटनात्मक तयारी करण्याचे आवाहन केले.
बैठकीला दिग्विजय पाटील, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, उपजिल्हाप्रमुख शाम गोसावी, बाबासाहेब दिवे, विजय काळे यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अविनाश सनस म्हणाले की, मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्विलोकन (SIR) हे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी राबवले जात आहे. बीएलओमार्फत मतदारांच्या नावांची, पत्त्यांची, वयाची व ओळखीची पडताळणी केली जात असून एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे राहू नयेत यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सनस यांनी सांगितले की, ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशी मोहीम राबविण्यात आली, तेथे मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या कमी झाल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शिवसैनिकांनी नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही यासाठी दक्ष राहावे.
ते पुढे म्हणाले की, देशातील लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना व संख्या वाढण्याची शक्यता आहे. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर राजकीय व्यवस्थेतही मोठे बदल अपेक्षित आहेत. पूर्वी एक लाख मतदारसंख्या गृहीत धरून अनेक विधानसभा मतदारसंघांची रचना करण्यात आली होती; मात्र आता वाढती लोकसंख्या लक्षात घेता मतदारसंघांच्या सीमांमध्ये आणि संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“तब्बल पंचवीस वर्षांनंतर इतक्या व्यापक स्वरूपात मतदार यादी पुनर्विलोकनाची प्रक्रिया राबविली जात आहे. अशा वेळी प्रत्येक शिवसैनिकाने बीएलओंसोबत समन्वय ठेवून काम करावे, मतदारांपर्यंत पोहोचावे आणि पक्षाची शाखा तसेच जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटनात्मक बळकटी, आगामी निवडणुकांची तयारी आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत सूचना केल्या. बैठकीस सागर बोठे, राहुल गोंदकर, अमोल लोंढे, पंकज शिंदे, नरेंद्र देशमुख, अक्षय सदाफळ, अशोक लोंढे, संतोष जाधव, अनिल पवार, हरिराम रहाणे, सोमनाथ महाले, अतुल कोते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“मतदार यादीतील एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहून नागरिकांना मदत करावी. भविष्यात मतदारसंघांची संख्या वाढल्यास नवीन राजकीय संधी निर्माण होतील. त्यामुळे संघटना मजबूत करणे ही काळाची गरज आहे.” — अविनाश सनस

