
अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे शिर्डी आणि राहाता परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “स्थानिक प्रभावशाली राजकीय पाठबळाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढू शकत नाही,” असे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या राजकीय वर्तुळावर निशाणा साधल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
डॉ. पिपाडा यांनी दावा केला की, राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात होत असून शिर्डी-राहाता परिसरात खून, खुनाचे प्रयत्न, महिलांवरील अत्याचार, चैन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी, दरोडे, गावठी कट्टे, जुगार अड्डे, गुटखा तस्करी, वाळू-मुरूम माफिया, ड्रग्ज आणि नशेच्या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
“सामान्य नागरिक आणि साईभक्त आता सुरक्षित आहेत का?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी धार्मिक नगरी शिर्डीची प्रतिमा गुन्हेगारीमुळे डागाळत चालल्याचा आरोप केला. “भाविकांची फसवणूक, दागिने चोरी, टोळ्यांचा धुमाकूळ आणि अवैध धंद्यांचं जाळं दिवसेंदिवस वाढत आहे,” असेही त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केले. “पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली,” असा आरोप करत त्यांनी पोलीस यंत्रणेतील कथित संगनमतावर प्रश्न उपस्थित केले. कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणापासून जप्त मुद्देमाल चोरीपर्यंत अनेक धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा दावा केला.
दरम्यान, डॉ. पिपाडा यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून “हे आरोप फक्त राजकीय स्टंट आहेत की वास्तव?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शिर्डी-राहाता हा प्रभावशाली राजकीय मतदारसंघ मानला जात असताना वाढती गुन्हेगारी हा स्थानिक नेतृत्वासाठी मोठा प्रश्न बनत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नागरिकांनी आता पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर आरोपांची दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “साईभक्तांची नगरी गुन्हेगारांच्या ताब्यात जाऊ देणार नाही,” अशी भावना देखील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“बुलडोझरची भाषा फक्त भाषणातच? गुन्हेगार असलेल्या दीपक पोकळेच्या घरावर का बुलडोझर चालवला नाही?
“गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवणार” म्हणणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता परिसरात गुन्हेगारी वाढीस कारणीभूत असल्याचा आरोप होत असलेल्या दीपक पोकळे याच्यावर अद्याप का बुलडोझर चालव lले नाही? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
“सामान्यांवर तात्काळ कारवाई होते… मग गुन्हेगार लोकांवर प्रशासन गप्प का?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत असून वाढत्या जुगार, अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रकरणांमुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.

