पाथर्डी : शहरातील समता पतसंस्थेने अचानक बोरिया-बिस्तर आवरून कार्यालय बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रोजच्या व्यवहारासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालय बंद दिसताच संतप्त ठेवीदारांनी संस्थेबाहेर गर्दी केली. अनेकांच्या आयुष्यभराच्या बचती अडकण्याची भीती निर्माण झाली असून शहरात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपासून पतसंस्थेचे व्यवहार संशयास्पद पद्धतीने सुरू होते. ठेवीदारांना पैसे परत मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर अचानक कार्यालय बंद करण्यात आल्याने “संस्था फरार झाली का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अनेक ठेवीदारांनी आपल्या कष्टाच्या कमाईची लाखो रुपयांची गुंतवणूक या पतसंस्थेत केली होती. आता मात्र कार्यालय बंद आणि जबाबदार अधिकारी संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित संचालक, अधिकारी आणि व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, प्रशासन आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा असून, या प्रकरणामुळे पाथर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
DN SPORTS

