
शिर्डी : जगभरातील लाखो साईभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डी साई संस्थानवर आता अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाले आहेत. दररोज हजारो भाविकांना मोफत भोजन देणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या प्रसादालयासाठी होणाऱ्या किराणा खरेदीत मोठा भ्रष्टाचार, बनवाबनवी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचा आरोप समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
साईबाबांच्या नावावर भक्तांकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या येतात. या देणगीतून प्रसादालयासाठी तांदूळ, गहू, कडधान्य, तेल, मसाले आणि इतर अन्नसाहित्य खरेदी केले जाते. मात्र आता या खरेदी प्रक्रियेतच “सॅम्पल एक आणि प्रत्यक्ष माल दुसराच” असा गंभीर प्रकार उघड झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, टेंडर प्रक्रियेदरम्यान पुरवठादारांकडून उच्च दर्जाचे नमुने दाखवले जातात. मात्र प्रत्यक्ष प्रसादालयात वापरासाठी येणारा माल कमी प्रतीचा असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “साईबाबांच्या नावावर भाविकांच्या श्रद्धेची लूट सुरू आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणामागे खरेदी विभागातील काही अधिकारी आणि ठराविक पुरवठादारांचे कथित संगनमत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मालाची गुणवत्ता तपासणे, नमुन्यांशी तुलना करणे आणि गैरप्रकार आढळल्यास अहवाल देणे ही जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
याहून धक्कादायक म्हणजे काही पुरवठादारांकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या पंचतारांकित हॉटेलमधील पार्ट्या, विमान प्रवास, आलिशान सहली आणि मौजमजेचा खर्च उचलला जात असल्याचीही माहिती समोर येत आहे. जर या आरोपांची चौकशीत पुष्टी झाली तर हा प्रकार केवळ भ्रष्टाचाराचा नसून साईभक्तांच्या श्रद्धेवरच थेट दरोडा असल्याचे मानले जात आहे.
दररोज हजारो गरीब, गरजू आणि भाविक प्रसादालयातील भोजन ग्रहण करतात. “साईप्रसाद” म्हणून भक्त विश्वासाने जे अन्न खातात, त्याच अन्नाच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर शिर्डीत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही साई संस्थानमधील अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर आली होती. मात्र बहुतांश प्रकरणे काही दिवस चर्चेत राहून नंतर दाबली गेल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे आता या प्रकरणात खरोखर कठोर कारवाई होणार की पुन्हा “फाईल क्लोज” होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “या प्रकरणात निष्पक्ष चौकशी झाली नाही, दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयात जाणार आहोत.”
भाविक आणि नागरिकांनी या प्रकरणाची स्वतंत्र SIT चौकशी करण्याची मागणी केली असून, ▪️संपूर्ण खरेदी प्रक्रिया तपासावी ▪️पुरवठादारांची चौकशी करावी ▪️दोषी अधिकारी निलंबित करावेत ▪️फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी होत आहे.
आता एकच प्रश्न संपूर्ण राज्य विचारत आहे — “साईबाबांच्या प्रसादातही जर भ्रष्टाचार शिरला असेल, तर भक्तांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?”
“संस्थानची खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक” — मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर 🛡️
शिर्डी साई संस्थानच्या प्रसादालयातील किराणा खरेदीबाबत करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिले आहे.
“संस्थानमध्ये होणारी प्रत्येक खरेदी ही शासन नियम, ई-टेंडर प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणीच्या निकषांनुसार केली जाते.
भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तडजोड केली जाणार नाही,”
असे गाडीलकर यांनी स्पष्ट केले.
संस्थान प्रशासनाच्या मते —
▪️ सर्व खरेदी प्रक्रिया अधिकृत समितीमार्फत केली जाते
▪️ नमुन्यांची गुणवत्ता तपासल्यानंतरच माल स्वीकृत केला जातो
▪️ प्रसादालयातील अन्नाची नियमित तपासणी केली जाते
▪️ भ्रष्टाचाराचे आरोप संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहेत
दररोज हजारो भाविकांना मोफत आणि स्वच्छ भोजन देणाऱ्या साई प्रसादालयाबाबत चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
“साईभक्तांचा विश्वास हेच संस्थानचे सर्वात मोठे बळ आहे,”
असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
━━━━━━━━━━━━━━━
“फुकट प्रसाद”वर बोट ठेवणारे आता गप्प का? 🔥
ज्या मंत्र्यांना आणि त्यांच्या चिरंजीवांना
“फुकट प्रसाद खाणारे” खटकत होते…
त्यांनी आता साईभक्तांच्या ताटात
निकृष्ट धान्य वाढणाऱ्यांवर बोलणार का?
कोट्यवधींच्या किराणा खरेदीत भ्रष्टाचार,
कमिशनखोरी आणि बनवाबनवीचे आरोप होत असताना —
मुख्य कार्यकारी अधिकारी, खरेदी विभाग आणि संबंधित चमूला
जाब कोण विचारणार?
▪️ सॅम्पल एक… माल दुसरा!
▪️ भाविकांच्या श्रद्धेवर कमिशनखोरी?
▪️ साईप्रसादाच्या नावावर निकृष्ट अन्न?
▪️ आणि वरून अधिकाऱ्यांच्या मौजमजा?
गरीब, गरजू आणि भक्तांच्या ताटातील
“साईप्रसाद”मध्ये जर भ्रष्टाचार शिरला असेल,
तर हा केवळ घोटाळा नाही…
हा साईभक्तांच्या श्रद्धेवरचा थेट दरोडा आहे!
आता प्रश्न एकच —
“दोषींवर कारवाई होणार… की पुन्हा फाईल दाबली जाणार?”
— संजय बबुताई भास्करराव काळे
