
शिर्डी, दि. २७ : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रस्त्यात अडवणूक, फसवणूक आणि आर्थिक लूट करणाऱ्या दलालांविरुद्ध प्रशासनाने ‘शून्य-सहनशीलता’ धोरण जाहीर केले आहे. उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी काढलेल्या विशेष आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भाविकांना थांबवणे, दिशाभूल करणे, ‘जलद दर्शन’च्या नावाखाली पैसे उकळणे, खासगी पार्किंगकडे जबरदस्तीने वळवणे किंवा पूजासाहित्य अवाजवी दराने घेण्यास भाग पाडणे यावर तात्काळ आणि कठोर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून अटक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुन्हेगारीला लगाम : आकडे बोलतात
जागतिक दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथे देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येतात. गर्दीच्या काळात काही प्रवृत्ती रस्त्यांवरच जाळे पसरवून गाड्या अडवतात, बनावट प्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करतात आणि अनधिकृत व्यवहार करतात. विरोध केल्यास दमदाटी, धक्काबुक्की आणि गैरवर्तनाच्या तक्रारी वाढल्या होत्या. बाहेरगावचे भाविक तक्रार देण्यास घाबरत असल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गेल्या दोन वर्षांत तब्बल ६५ गुन्हे नोंदवले आहेत.
आक्षेप फेटाळले; कायमस्वरूपी आदेश लागू
पोलीस, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट आणि नगरपरिषद यांच्या अहवालावरून २ फेब्रुवारीला प्राथमिक आदेश काढण्यात आला होता. काही आक्षेप नोंदवले गेले; मात्र “कायदेशीर व्यवसायावर गदा नाही—उपद्रवी व बेकायदेशीर कृत्यांनाच लगाम” असे स्पष्ट करत प्रशासनाने आक्षेप फेटाळले आणि आदेश कायमस्वरूपी लागू केला.
नेमकी काय मनाई?
रस्ते, चौक, बसस्थानक, मंदिर प्रवेशमार्गांवर उभे राहून भाविकांशी मध्यस्थी करणे पूर्णपणे बंद.
स्वतःला संस्थान/प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून भासवून निवास, भोजन, दर्शन, पार्किंग आदींच्या नावाखाली व्यवहार करण्यास सक्त मनाई.
‘जलद दर्शन’ किंवा विशेष सुविधा देण्याच्या बहाण्याने पैसे उकळणे हा दंडनीय गुन्हा.
गाड्या अडवणे, जबरदस्तीने खासगी पार्किंगकडे वळवणे, अवाजवी दर आकारणे—तात्काळ कारवाई.
कठोर कायदेशीर कारवाई
नियम मोडणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करून अटक, जामीनाला विरोध आणि पुनरावृत्ती झाल्यास कठोर पावले उचलली जाणार आहेत. शिर्डी पोलिसांना विशेष पथके, सिव्हिल कपड्यातील कर्मचारी, सीसीटीव्ही देखरेख आणि सतत गस्त यांचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाचा इशारा स्पष्ट
“साईनगरीत भाविकांची फसवणूक सहन केली जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांना थेट जेलची हवा खावी लागेल,” असा कडक संदेश प्रशासनाने दिला आहे.
संदेश एकच — साईनगरी स्वच्छ, सुरक्षित आणि दलालमुक्त करण्यासाठी प्रशासन ‘सतर्क मोड’मध्ये; कायदा मोडला तर तात्काळ कारवाई!

