

मुंबई | प्रतिनिधी
कुटुंबावर कोसळलेले अपार दुःख, राजकीय पोकळी आणि पक्षाचे भवितव्य या सगळ्यांवर धीरोदात्तपणे मात करत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी ठीक पाच वाजता राजभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यासह महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची नोंद झाली आहे.
शपथविधीच्या वेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांना स्मरून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी उपस्थित आमदार, मंत्री, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक भावूक झाले होते.
“एकच वादा अजितदादा… अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी राजभवनाचा सेंट्रल हॉल अक्षरशः दुमदुमून गेला.
देवगिरीवरून राजभवनाकडे भावनिक वाटचाल
शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवार यांनी शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’ येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नम्र अभिवादन केले. काही क्षण मौन पाळून त्यांनी राजभवनाकडे प्रस्थान केले.
शपथ घेण्याआधीही त्यांनी अजित पवार यांना मनोमन नमन करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊनच आपण या जबाबदारीला सुरुवात करत आहोत, अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
दुःखातून उभारी, पक्षासाठी धाडसी पाऊल
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षावर मोठे संकट ओढावले होते. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत पक्षाची धुरा हाती घेतली.
पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी त्यांनी हे जबाबदारीचे पद स्वीकारल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
महिला नेतृत्वाचा नवा अध्याय
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राजकारणात संयम, शांतता आणि ठाम निर्णयक्षमता यांचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उपमुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेतून त्या राज्याच्या विकासाला नवी दिशा देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

