सुजय दादांच्या कार्ड-मोजणीवर आक्षेप_अन्याय बंद न झाल्यास ५ तारखेपासून आमरण उपोषणाचा आरणे यांचा थेट इशारा
शिर्डी शहरातील नागरिकांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी आता संयम सोडत थेट संघर्षाचा इशारा दिला आहे. सुजय दादा यांनी आणलेल्या कार्डच्या आधारे तसेच जागा मोजणीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असून, हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा, अशी ठणकावून मागणी त्यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांना केली आहे.
कार्ड व मोजणीच्या प्रक्रियेच्या आडून नागरिकांमध्ये भीती, दहशत आणि मानसिक त्रासाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप करत, प्रशासनाने जर अजूनही डोळेझाक केली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा थेट इशारा आरणे यांनी दिला आहे.
“हा लढा माझा वैयक्तिक नाही, तर शिर्डीतील सामान्य नागरिकांच्या हक्कांचा आहे,” असे ठामपणे सांगत, दिनांक ५ पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णायक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. प्रशासन हलले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे शिर्डीच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. प्रशासन न्याय देणार की नागरिकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संपूर्ण शहराचे लक्ष आता मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे लागले आहे.
