
राहाता | प्रतिनिधी :
सामान्य नागरिकांना जलद, सुलभ आणि खर्चविरहित न्याय मिळावा या उद्देशाने जिल्हा न्यायालय, राहाता येथे शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायदानाचा नवा विक्रम नोंदवण्यात आला. एका दिवसात तब्बल २७८८ प्रकरणे निकाली काढत रुपये २,०१,३८,०६७/- इतक्या मोठ्या रकमेची वसुली करण्यात आली. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाला गती मिळून नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रलंबित प्रकरणांना तडजोडीतून पूर्णविराम
न्याय, सलोखा आणि सामाजिक शांततेचा लोकअदालतीत संगम
राष्ट्रीय लोकअदालत ही केवळ प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया नसून, वादातून संवादाकडे नेणारे प्रभावी माध्यम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. किरकोळ गुन्हे, कौटुंबिक वाद, धनादेश प्रकरणे, मोटार अपघात भरपाई, वसुली प्रकरणे आदी विविध स्वरूपाच्या प्रकरणांवर परस्पर संमतीने तोडगा काढण्यात आला.
यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यांपासून पक्षकारांची सुटका होऊन मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दिलासा मिळाला.
कौटुंबिक वाद मिटवण्यात अॅड. विलास आसणे यांची निर्णायक भूमिका
९ जुनी प्रकरणे तडजोडीने निकाली; कुटुंबाला नव्या आयुष्याची सुरुवात
या लोकअदालतीतील विशेष बाब म्हणजे अॅड. विलास आसणे यांच्या अथक व संवेदनशील प्रयत्नांतून श्रीमती कोमल किशोर पंजाबी विरुद्ध श्री. किशोर पंजाबी या दाम्पत्यातील एकूण ९ जुनी व प्रलंबित कौटुंबिक प्रकरणे एका दिवसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.
दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे निर्माण झालेला तणाव संपवून दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक तोडगा काढता आला. लोकअदालतीचा खरा उद्देश – न्यायासोबत माणुसकी – यावेळी प्रत्यक्ष अनुभवास आला.
उत्कृष्ट कार्याची न्यायालयीन दखल
अॅड. विलास आसणे यांचा न्यायालयामार्फत विशेष सत्कार
कौटुंबिक वाद मिटवून सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत न्यायालयाच्या वतीने अॅड. विलास आसणे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
न्यायाधीशांनी लोकअदालतीच्या माध्यमातून तडजोडीने वाद मिटवण्याचे महत्त्व अधोरेखित करत, भविष्यातही नागरिकांनी या प्रक्रियेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
मान्यवरांच्या उपस्थितीने लोकअदालतीला प्रतिष्ठा
न्यायाधीश, वकील व कर्मचारी यांचा समन्वय ठरला यशाचा कणा
या राष्ट्रीय लोकअदालतीत मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. राजेश एस. गुप्ता,
मा. न्यायाधीश श्री. पी. आर. फुलारी,
अॅड. वर्षा धिवर, अॅड. स्मिता देशमुख, श्री. मा. न्यायाधीश एस. बी. शेख, श्री. के. सी. राजपुत, श्री. एस. आर. भरड, श्री. पी. एस. गिरगांवकर, अॅड. बावके
तसेच न्यायालयीन कर्मचारी श्री. सागर डावखर, श्री. सलिम पठाण, श्री. राहुल गौसावी यांची उपस्थिती लाभली.
न्यायाधीश, वकील व कर्मचारी यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे लोकअदालतीचे उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य झाले

