अहिल्यानगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता नवा वळण लागलं आहे. मंगळवारी मतदान पार पडत असताना काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, नागपूर खंडपीठानं मतमोजणीची तारीख थेट 21 डिसेंबर निश्चित करताच राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ माजला आहे. या सगळ्या परिस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर थेट आणि तुफान हल्ला चढवला.
“निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झालाय!” – थोरातांचा स्फोटक आरोप
थोरात म्हणाले, “निवडणूक आयोगातील अधिकारी हे उच्च दर्जाचे आयएएस आहेत. त्यांनी शेकडो निवडणुका पाहिल्या आहेत… मग असा गोंधळ कसा होऊ शकतो? मंत्रालयातील एखाद्या पीएननं कार्यक्रम बनवला आणि आयोगानं त्यावर शिक्कामोर्तब केलं! आयोगाला कोणाचं तरी बंधन आहे. आता निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झालाय — हा आरोप अगदी खरा आहे.”
थोरातांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.
मतदार याद्यांमधील दोषावर थोरातांचा थेट सवाल
मतमोजणी पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. पण यावर थोरातांनी पलटवार करत म्हणाले, “मुख्यमंत्री स्वतःवरचं बालट झाकण्यासाठी भूमिका घेत आहेत. अनेक वेळा मतदार याद्यांमधील गंभीर दोष दाखवूनही ते दुरुस्त होत नाहीत. तहसीलदार म्हणतात अधिकार नाहीत… म्हणजे स्पष्टच सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे.”
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे… राज्यातील राजकारण तापलं
न्यायालयाचा निर्णय, आयोगाची भूमिका, याद्यांतील दोष, आणि सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप—या सगळ्यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. थोरातांच्या या प्रखर टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसतायत.

