
अहिल्यानगर, दि. 10: जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव-बिबट संघर्षाच्या घटना वाढल्या असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
संवेदनशील भागांमध्ये बेस कॅम्प सुरू करून तेथून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंध समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🏡 ग्रामपंचायतीमार्फत व्यापक जनजागृती आवश्यक
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, काही भागांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मानव आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे.
ग्रामपंचायतींनी नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन द्यावे, तर संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी गावा-गावांत जनजागृती कार्यक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्तरावर संपर्कासाठी 1926 हा क्रमांक उपलब्ध असून, जिल्हास्तरावर स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरू करण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
🚨 जलद कृती दल आणि कॉम्बिंग ऑपरेशनची तयारी
वन विभागाकडील सर्व पिंजरे संवेदनशील भागांत बसवावेत, बिबट्याची माहिती मिळताच Quick Response Team घटनास्थळी पोहोचावी, असा आदेश देण्यात आला.
रात्रीच्या वेळी अखंडित वीजपुरवठा, रस्त्यालगतच्या झुडपांची छाटणी आणि नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग यावरही भर देण्यात आला.
बिबट्यांना पकडण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून प्रशिक्षित पथकांची मदत घ्यावी, तसेच थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, लॉग रेंज टॉर्च आणि रेस्क्यू वाहने वन विभागास उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
🛰️ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बिबट्यांवर नियंत्रण
उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले की, ट्रॅप कॅमेरे, पगमार्क व विष्ठेच्या आधारे दररोज बिबट्याच्या हालचालींचा आढावा घेतला जातो.
कमांड कंट्रोल रूम स्थापन करून एआय आधारित अलार्म प्रणाली, ड्रोन टेहळणी, आरएफआयडी मायक्रोचिप आणि अॅनिमल रिपेलंट तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे.
राहुरी वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू झाले असून, स्वतंत्र बिबट्या रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे.
बैठकीत सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करून बिबट्याच्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याचा एकमताने निर्धार व्यक्त करण्यात आला.