राहता | प्रतिनिधी
राहता शहरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या रेशनच्या तांदळाची कथित तस्करी आणि काळाबाजार पुन्हा जोरात सुरू असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात तांदळाने भरलेला ट्रक जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही हा प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते; तर दुसरीकडे त्याच धान्याचा काळ्या बाजारात व्यवहार होत असेल तर हा केवळ धान्याचा गैरव्यवहार नसून गरिबांच्या हक्कावरचा दरोडा आहे.
ट्रक पकडला, मग काळाबाजाराचे नेटवर्क उध्वस्त का झाले नाही?
मागील आठवड्यात कारवाई करत रेशनच्या तांदळाचा ट्रक जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा तांदळाची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एक ट्रक पकडल्याने प्रश्न संपत नाही; त्या ट्रकपर्यंत माल पोहोचवणारे कोण, माल कुठून जमा केला गेला आणि तो पुढे कुठे जाणार होता, याचा तपास झाला का?
रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जातो तरी कसा?
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य ठरावीक लाभार्थ्यांसाठी असते. मग हे धान्य दुकानातून बाहेर पडून व्यापाऱ्यांपर्यंत किंवा काळ्या बाजारापर्यंत पोहोचत असेल, तर या साखळीतील प्रत्येक कडी तपासण्याची गरज आहे.
रेशन दुकानदार, वाहतूकदार, साठवणूकदार, व्यापारी आणि संबंधित मध्यस्थ—या संपूर्ण साखळीची चौकशी झाली पाहिजे.
त्याहून महत्त्वाचे म्हणजे, पुरवठा विभागातील कोणाचा या कथित गैरव्यवहाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे का? याचीही निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
तहसीलदारांनी आता थेट कारवाई करावी
राहता तालुक्याचे तहसीलदार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन केवळ एखादा ट्रक पकडण्यापुरती कारवाई न करता रेशनच्या तांदळाच्या कथित काळ्या बाजाराचे संपूर्ण नेटवर्क शोधून काढावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तसेच अचानक तपासणी, गोदामांची तपासणी, संशयास्पद वाहतुकीवर नजर आणि संबंधित रेशन दुकानांच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्याची गरज आहे.
दैनिक साईदर्शनचा थेट सवाल
एक ट्रक पकडला, गुन्हा दाखल झाला; तरी तांदळाचा काळाबाजार सुरूच असेल तर कारवाईचा धाक कुणाला आहे?
रेशनचा तांदूळ गरिबांच्या ताटात जाण्याऐवजी काळ्या बाजारात जात असेल, तर या साखळीतील ‘मोठे मासे’ कधी गजाआड जाणार?
राहता तालुक्यातील नागरिकांना आता कडक, निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाईची अपेक्षा आहे. दोषी कोणताही असो—व्यापारी असो, वाहतूकदार असो अथवा शासकीय यंत्रणेतील कोणी—तपासात दोष सिद्ध झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.