शिर्डी | प्रतिनिधी :
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी व दान करण्यासाठी आल्याचे सांगत दोन भामट्यांनी एका महिलेला गंडा घातल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील पिंपळवाडी रोड परिसरात घडली. मंदिरात पाच हजार रुपये दान केल्याचे सांगून तसेच जवळील दर्ग्यातही दान करण्याचे आमिष दाखवत या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची, अंदाजे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हातचलाखीने लंपास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुकसाना मोहम्मद सय्यद (वय ५७, रा. पिंपळवाडी रोड, शिर्डी) या आपल्या पानटपरीवर बसलेल्या असताना दुपारी सुमारे २.१० वाजता दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून तेथे आले. त्यांनी सिगारेट घेतल्यानंतर संभाषण सुरू केले. आम्ही श्री साईबाबा समाधी मंदिरात नुकतेच ५ हजार रुपये दान केले असल्याचे त्यांनी महिलेला सांगितले.

त्यानंतर परिसरातील मंदिराबाबत विचारणा करून, तेथेही दान करायचे असल्याचे सांगत त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. याचदरम्यान महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत कागदामध्ये ठेवण्यास सांगितले. महिलेने पोत काढून त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनी ती कागदात ठेवून कागद गुंडाळला आणि महिलेकडे परत दिला.
‘आम्ही नारळ घेऊन येतो, तोपर्यंत कागद उघडू नका’ असे सांगून दोन्ही भामटे मोटारसायकलवरून निघून गेले. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने महिलेने कागद उघडून पाहिला असता त्यामध्ये सोन्याची पोत नसल्याचे आढळून आले. आपली हातचलाखीने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0747/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 317(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
दानाच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा?
शिर्डीसारख्या धार्मिक शहरात भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याने नागरिकांनी व भाविकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.