पुणतांबा | प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे योगीराज संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात आषाढी वद्य कामिका एकादशीनिमित्त अर्थात धाकटी एकादशीला भाविकांचा अभूतपूर्व जनसागर उसळला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून वारकरी, दिंड्या आणि हजारो भाविक पुणतांब्यात दाखल झाले. मध्यरात्री एक वाजल्यापासूनच दर्शनासाठी भाविकांच्या शिस्तबद्ध रांगा लागल्या होत्या.
‘जय हरी विठ्ठल’, ‘चांगदेव महाराजांचा जयजयकार’ अशा घोषणांनी दक्षिणोत्तर वाहणाऱ्या गोदावरी नदीचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.

३५० ते ४०० वर्षांची भक्तीची परंपरा
पुणतांबा येथील धाकटी एकादशीची यात्रा ही वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धेची मानली जाते. पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर पुणतांब्याची वारी केल्याशिवाय वारीचे फळ पूर्ण होत नाही, अशी वारकरी भाविकांची श्रद्धा आहे.
या यात्रेला सुमारे ३५० ते ४०० वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. योगीराज संत चांगदेव महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर वारकरी संप्रदायातील संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याप्रती असलेल्या करुणेतून ही परंपरा पुढे आली, अशी आख्यायिका आहे.
गोदावरी स्नान अन् चांगदेव महाराजांचे दर्शन
धाकटी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी दक्षिणोत्तर वाहणाऱ्या पवित्र गोदावरी नदीत स्नान करून संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधीचे तसेच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. दिंड्यांसह आलेल्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण पुणतांबा परिसराला जणू पंढरीचेच स्वरूप प्राप्त झाले होते.
यावेळी बोलताना महेश महाराज मुरदगण यांनी या परंपरेमागील श्रद्धा स्पष्ट केली. चांगदेव महाराजांनी समाधी घेतल्यानंतर वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी भगवान पांडुरंगाने आषाढी वारीप्रमाणे धाकट्या आषाढीच्या यात्रेला अंशरूपाने चांगदेव महाराजांच्या समाधीस्थळी भेट देण्याचे आश्वासन दिल्याची भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मोफत महाप्रसादाची व्यवस्था; स्वयंसेवकांचीही धावपळ
यात्रेसाठी मंदिर संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने भाविक व वारकऱ्यांसाठी मोफत महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि गर्दीचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी ठिकठिकाणी चौक बॅरिकेटिंग करण्यात आले होते.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य करत भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले.
कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी राहाता पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांची मोठी गर्दी असूनही दर्शन व्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले.
गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या पुणतांब्यात धाकटी एकादशीच्या निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पहाटेपासून रात्रीपर्यंत टाळ-मृदंगाचा गजर, अभंगांचे सूर आणि ‘विठ्ठल-चांगदेव महाराज’च्या जयघोषाने संपूर्ण पुणतांबा भक्तिरसात न्हाऊन निघाला.