ते घरी येतील तेव्हाच आमची दिवाळी”, जरांगेंच्या पत्नीचा निर्धार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी कंबर कसली असून आरक्षण मिळत नाही तोवर शांत न बसण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची रणनीती आखली आहे. सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून तोपर्यंत त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निश्चय केलाय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील दिवाळी साजरी करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, त्यांच्या घरातही दिवाळीची रोषणाई झाली नसल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या की, मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यासाठी त्यांचा अभिमान आहे. आम्ही दिवाळी साजरी केली नाही आणि करणारही नाही. ते २४ डिसेंबरला घरी येतील तेव्हाच दिवाळी साजरी करणार. ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.तसंच, “सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, म्हणजे ते लवकर घरी येतील आणि २४ डिसेंबरला आम्ही दिवाळी साजरी करू.