
राहता शहरात गेल्या काही महिन्यांत वाढलेल्या गुन्हेगारी, अवैध धंदे आणि पोलिस प्रशासनावरील उडालेल्या विश्वासाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार जीतेश लोकचंदानी यांनी थेट महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, गृहमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक आणि पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे धडक तक्रार अर्ज सादर करत तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लोकचंदानी यांनी आपल्या निवेदनात राहता शहरात नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप केला आहे. शहरात नशेखोरी, मटका, अवैध धंदे, दहशत, चोऱ्या, महिलांवरील अत्याचार आणि टोळक्यांची दादागिरी वाढली असताना पोलिसांचा धाक पूर्णतः संपल्याचे चित्र निर्माण झाले होते, असा संतप्त आरोप करण्यात आला आहे.
या निवेदनातील सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे एका निष्पाप १२ वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणाचा. भरधाव वाहन अंगावर दोनदा घालून त्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली, मात्र एवढ्या गंभीर घटनेत देखील पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला नाही. उलट मृत मुलाच्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना पोलीस ठाण्यात अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांना मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात आंदोलन करावे लागल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
“अवैध धंदे आणि गुन्हेगारांना नेमकं कोणाचं संरक्षण होतं?” असा थेट सवाल करत लोकचंदानी यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली का, काही गुन्हेगारांना जाणीवपूर्वक अभय देण्यात आले का, तसेच गुन्हे दडपण्यासाठी फिर्यादी घेण्यास टाळाटाळ झाली का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
केवळ बदली करून इतक्या गंभीर प्रकरणावर पडदा टाकू नये, संबंधित अधिकारी नितीन चव्हाण यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करून राहता शहरातील नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, असेही लोकचंदानी यांनी म्हटले आहे.

