मंदिर परिसरात ड्रॉन उडविण्यास बंदी असताना रील बनविण्यासाठी ड्रॉन वापर करणाऱ्यावर साईबाबा संस्थान काय कारवाई करणार
शिर्डी-
मध्यंतरी devdxb या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरून श्री साईबाबा संस्थान शिरडीच्या सुरक्षा क्षेत्रात येणाऱ्या साईबाबांच्या लेंडीबागेवरून ड्रोन उडवून व्हिडीओ पोस्ट करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही व्हिडिओ खरे की खोटं हा नंतरचा चौकशीचा विषय आहे. मात्र ही व्हिडिओ पोस्ट कोणी केली? कशासाठी केली? तिला करण्यास कोणी परवानगी दिली आहे!हा मोठा प्रश्न आहे.
येथील समस्त मंदिर परिसराचे क्षेत्र हे ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र DSRZONE0007745 असताना या अकाउंटवर व्हिडीओ ज्याने पोस्ट केला त्यास व्हिडीओ शूट करण्याची परवानगी दिली कोणी ? या आधी संस्थानने याच साई भक्तांच्या सुरक्षेच्या कारणामुळे ०६.०८.२०२१ या दिवशी ठराव घेत चक्क पर्यटन विभागासच व्हिडीओ न काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण आता वरील घटना घडते ती लक्षातही न येणारी साईबाबा संस्थानची ही सुसज्ज सुरक्षा यंत्रणा ! त्यात केंद्र व राज्यातील गुप्तचर विभागापासून औद्योगिक सुरक्षा यंत्रणेपर्यंत ही बाब लक्षात येऊ नये .रशिया तसेच इस्राईलमध्ये सुरक्षा यंत्रणा सदैव अलर्टवर असताही तिथे ड्रोनमुळे कशा अप्रिय घटना घडल्या याचे संपूर्ण विश्व साक्षीदार आहे. नुकतीच भारताच्या संसद भवनातील घुसखोरी ताजी असताना संस्थानकडून असे दुर्लक्ष होणे साईभक्तांच्या सुरक्षेला परवडणारे नाही.
अशी परवानगी दिली गेली का आणि दिली तर दिली कोणी याची सखोल चौकशी होऊन ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा द्वारकामाई मशिदीजवळचा बोर्ड का काढला गेला याचेही स्पष्टीकरण संस्थानच्या संबंधित अधिकाऱ्याने द्यायला हवे. हा संपूर्ण परिसर ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र आहे अशी नोंद नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ( DGCA ) अधिकृत वेबसाईटवर आहे. तरी इथे ड्रोन उडून जातो मग कसली मोबाईल आणि कॅमेरा बंदी हो !
सध्या सद्गुरू साईनाथ बाबा महाराज यांच्यावर सर्वत्र एखादं जाती धर्माचे असल्याचा ठपका ठेवून बदनामी सुरू आहे.
यापूर्वी अत्यंत अर्वाच्य शब्दात एक जैन मुनी, ज्योतिष व द्वारकापीठाचे भूतपूर्व शंकराचार्य, तसेच धाम सरकारचे सेवक, इकडचे नासाचे गुरूजी अशा प्रसिद्ध लोकांनी बाबांबद्दल खोटी माहिती प्रसारित करून बाबांच्या भक्तांत व एकंदर जगभरात संभ्रम निर्माण करायचे कार्य केले. अशा अपप्रवृत्ती विरुद्ध लिहत असताना बाबा कोणत्या एका जाती धर्म पंथाचे नाहीत हीच शेवटी अंतिम भूमिका आहे. सध्या गावकऱ्यांच्या दबावामुळे संस्थान अशा लोकांवर गुन्हे दाखल करत आहे.
परंतु गावकऱ्यांतील काही मोजक्या लोकांनी शिरडी परिक्रमा जणू काही बाबांचा गौरवशाली इतिहास असल्यागत नावारूपाला आणली. या शिर्डी परिक्रमेच्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल होते. या आधी गावकऱ्यांनी सुरू केलेल्या पारायण सोहळ्याची जबाबदारी संस्थानला बाबांचा प्रचार प्रसार करायला स्वीकारावी लागली आहे. तशाच पद्धतीने ही परिक्रमा म्हणजे जणू बाबांची परंपराच संस्थानतर्फे चालू आहे असे भासवून सर्व खर्च संस्थानचा की काय हा श्री साईबाबा संस्थान लोगो वापरत असल्यानं प्रश्न पडतो. परंतु संस्थानने हा संस्थानचा परंपरागत उत्सव नसल्याने काहीही मदत करण्यास मनाई करण्याचा ठराव २०.०१.२०२३ या दिवशी केला आहे.
तरी याची सांगता झाली ती १६ गुंठे मधील संस्थानच्याच स्टेजवर…. तेही संस्थानकडून अनधिकृत मदत घेऊन संस्थानला जमा झालेला किती निधी रक्कम वर्ग झाली या खर्चाचाही हिशोब कोणी मागत नाही पण परिक्रमा अधिकृत भासवावी म्हणून संस्थानचा लोगो मागच्या परिक्रमेत वापरून निधी जमा केला गेलाच. संस्थानने यावर काहीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. मग तो लोगो म्हणजे संस्थानची रॉयल्टी नाही का ? खरं तर असं होतं असल्यास संस्थाननेच स्वतः ही परिक्रमा ही आयोजित करून या उत्सवास साईसच्चरित पारायणासम उत्सवात बसवावे आणि निधी स्वतः जमा करावा. जेणेकरून निधी कोणाच्याही वैयक्तिक वा प्रायवेट संस्थेच्या खात्यात न जाता संस्थानकडे जमा होईल आणि संस्थानच्या लोगोचा व निधीचा गैरवापर ही होणार नाही. बर आता संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीच बातमीनुसार रील बनवावी म्हणून आग्रही आहेत जेणेकरून बाबांचा प्रचार प्रसार होत खरी माहिती लोकांपुढे येईल.
असे रीलप्रेमी उत्साही अधिकारी असताना त्यांच्या नजरेतून हा ड्रोनने काढलेला व्हिडीओ कसा सुटला हा एक यक्षप्रश्नच ! सुरक्षा यंत्रणा ड्रोन उडून जातो तरी मुस्तैद असताना अजून रील काढून संस्थानची संवेदनशील माहिती सार्वजनिक करावी हे विधान तर्कसुसंगत तरी आहे का ? संस्थान परिसरातून ड्रोन उडतो आणि देशातील २ नंबर श्रीमंत संस्थानचा संरक्षण विभाग बघत बसला का ??? बाबांच्या बदनामीवर रील हे औषध ठरण्याआधी या ड्रोनने काढलेल्या व्हिडीओमूळे शिर्डीच्या सुरक्षेवर नांगर फिरवला गेला नाही म्हणजे मिळवले. सेल्फ प्रोक्लेम्ड साईभक्त कळसाचा बॅकग्राऊंड घेऊन ओम साईराम म्हणत हातवारे करत रील काढतात ही गोष्ट सुसंस्कृतपणात अगदी फिट बसतेच.
पण अशाच गोष्टींच्या अतिरेकामुळे एकीकडे केदारनाथ मंदिरात अशा रील काढण्यास बंदी केली असून दुसरीकडे अशा बातम्यांमुळे आज साईबाबांच्या संस्थानचे अधिकारीच अशा गोष्टींना प्रोत्साहित करतात की काय हा ही प्रश्न उद्भवतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन असे रील बनवायला कोणते हॉटेल वा घरमालक आपली टेरेस उपलब्ध करून देतो हे ही तपासायला हवे. शेवटी साईबाबांची आणि त्यांच्या मंदिराची सुरक्षा सर्वोपरी. पण इथे कर्तुमअकर्तुमन्यथाकर्तुम साईबाबाच यांची सुरक्षा करताना दिसत आहेत. जर त्यांनी अभयहस्त काढून घेतला तर खरोखर काही हातात राहणार नाही.
येथे कायदा व नियम असताही हे बाबांचं आहे बापाच नाही हे कधी लक्षात येणार …. म्हणून संस्थानने अशा गोष्टींवर आळा घालून या गोष्टी बंद होतील याची दक्षता वेळीच घेणे जरुरी आहे. अन्यथा पाप करील त्याला फटका द्यायला श्री साईबाबांचा सटका सर्व समर्थ आहे. असे शिर्डी येथील ऋषिक चंद्रचूड श्री.बाबासाहेब गायकवाड यांनी आपल्या फेसबुक वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या गोष्टीची आता मोठी चर्चा सध्या सुरू आहे. साईभक्त, ग्रामस्थ यांनीही या प्रकाराची खरे काय खोटे काय याची चौकशी व्हावी .अशी मागणी केली आहे. दैनिक साईदर्शन या प्रकाराची पुष्टी करत नाही. मात्र साई भक्तात नागरिकात तशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी होण्याची साई भक्तांची मागणी आहे.