“राज्यात नामर्दांचं सरकार”!संजय राऊत
शिवसेना नेते दत्ता दळवी यांच्या अटकेच्या प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते दत्ता दळवींना मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. “राज्यात नामर्दांचं सरकार चालू आहे”, असं संजय आज सकाळी राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
दत्ता दळवींची गाडी फोडली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून दत्ता दळवींवर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. बुधवारी संध्याकाळी दत्ता दळवींची गाडी काही अज्ञातांनी फोडल्याचं उघड झालं आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. “दत्ता दळवी तुरुंगात आहेत. त्यांच्या घरी कुणी नाहीये. दोन-चार षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले. ही त्यांची मर्दानगी. ते भाडोत्री गुंड अशा गोष्टी करण्यासाठी घेतात आणि गुंडगिरी चालवतात”, असं संजय राऊत म्हणाले.