
दिल्लीतील नामांकित सेंट कोलंबस शाळेत मराठी विद्यार्थ्यावर झालेल्या कथित मानसिक छळामुळे एका कोवळ्या जीवाने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या शौर्य प्रदीप पाटील याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांगलीच्या मातीत जन्मलेलं लेकरू; दिल्लीतील व्यवस्थेचा बळी
शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी होता. वडील प्रदीप पाटील हे व्यवसायानिमित्त गेली अनेक वर्षे दिल्ली येथे स्थायिक असल्याने शौर्य कुटुंबासह नवी दिल्लीतील राजीव नगर परिसरात राहत होता. शिक्षणासाठी त्याला सेंट कोलंबस शाळेत दाखल करण्यात आले; मात्र तेच शाळेचे वातावरण त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.
सुसाइड नोटने खळबळ; प्राचार्या व शिक्षिकांविरोधात गुन्हे दाखल
18 नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून उडी मारून शौर्यने आत्महत्या केली. दीड पानांच्या सुसाइड नोटमध्ये शाळेतील काही शिक्षिकांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा थेट उल्लेख शौर्यने केला आहे. या गंभीर प्रकरणी राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन व ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील संतप्त; “न्याय नाही तर आंदोलन”चा इशारा
या घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर असून ते शौर्य पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी थेट इशारा देत म्हटले, “न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल. मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव आलं की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री गप्प का?” असा सवाल करत केंद्र सरकारकडे दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

