अहिल्यानगर – राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील १८१ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १०९ उमेदवारांना लिपिक पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे एकूण २९० तरुणांना शासकीय नोकरी मिळणार आहे.
४ ऑक्टोबर रोजी नियुक्तीपत्रांचे वितरण
पालकमंत्री विखे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते व तहसीलदार शरद घोरपडे यांचाही कार्यक्रमात सहभाग असेल.
कागदपत्र पडताळणी पूर्ण
अनुकंपा व एमपीएससीमार्फत शिफारस झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारांच्या पसंतीनुसार विभाग व रिक्त जागांवर शिफारस करण्यात आली आहे.
जिल्ह्यात रोजगाराची संधी
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराची संधी मिळेल.
