
शिर्डी( प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत बोलवले होते, मुंबईत आपण गेल्यानंतर पक्षातील व मतदार संघातील अडीअडचणी पक्षश्रेष्ठींसमोर मांडल्या. व उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करू, व मगच काय तो निर्णय घेऊ !असे आपण पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे शिर्डीतील अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी दैनिक साई दर्शनशी बोलताना सांगितले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने भाजपाचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिर्डी मतदार संघामध्ये आपणाला उमेदवारी द्यावी. अशी मागणी डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वी केली होती. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी बैलगाडीत येऊन हा अर्ज राहाता येथे दाखल केला होता.
त्याची चर्चाही मोठी झाली होती. डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षश्रेष्ठींमध्ये याविषयी माहिती मिळताच पक्षश्रेष्ठींनी डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावून घेतले. त्यासाठी चार्टर्ड विमानही पाठवले असल्याचे समजते. या चार्टर्ड विमानाने डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे तातडीने मुंबईला गेले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. पक्षातील व मतदार संघातील अडीअडचणी पिपाडा यांनी पक्षासमोर मांडल्या.
उमेदवारी अर्ज दाखल केल्याची कारणेही त्यांनी यावेळी सांगितल्याचे समजते. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यामुळे डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे आपली भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय ठरवतात? याकडे आता भाजपा बरोबरच शिर्डी मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. व तशी चर्चा ऐकू येत आहे.