
शिर्डी (प्रतिनिधी)
देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या अंधार युगात उमाजी नाईक यांच्यासारखा तेजस्वी सूर्य उदयाला आला. व खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारून त्यांनी देशासाठी प्रथम बलिदान दिले. त्यांचे महान कार्य आजही देशासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व इतिहासकार डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.

आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी राजे नाईक यांच्या 193 वा बलिदान दिन नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्रीक्षेत्र जेजुरी येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध लेखक इतिहासकार
डॉ. श्रीमंत कोकाटे सर व मी सावित्री बोलते या एकपात्री नाटकाच्या मुख्य नायिका कविताताई म्हेत्रे व संघटनेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र जेजुरी गडावरील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या ठिकाणी जय जयकार करत मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली.
त्यानंतर जेजुरी नगरपालिकेसमोरील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सांस्कृतिक भवनामध्ये हा बलिदान दिनाचा सोहळा संपन्न झाला. येथेही प्रथम राजे उमाजी नाईकांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रांतिकारी रामोशी समाजात व नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक संघटनेमध्ये गेल्या 30- 40 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या व विशेष योगदान देणाऱ्या राम मंडले( सांगली) रघुनाथ गुजले (सोलापूर)
कुंडलिक मंडले (कोल्हापूर )सिताराम जेडगुले, देवराम गुळवे, राजकुमार गडकरी, बंडोपंत खर्डे ,संजय चव्हाण, (अहिल्यानगर) विजय मंडले (नाशिक) जगन माकर , आप्पा माकर ( पुणे) संतोषकुमार पाटोळे (सोलापूर) सुरेश मंडले (उस्मानाबाद ) आदी वीस कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संघटनेचे प्रांताध्यक्ष वसंतराव चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले होते.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
उमाजी राजे यांनी देशासाठी मरण घेतलं पण शरण स्वीकारलं नाही. ते इंग्रजांना लुटायचे व गरिबांना वाटायचे. मासा पाण्यात जन्म घेतो पण त्याला पाण्यात पोहण्याचे प्रशिक्षणाची गरज नसते .तसेच उमाजी राजे हे क्रांतिकारी रामोशी समाजात जन्मले त्यामुळे त्यांना जन्मताच अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांची कृती सामाजिक सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्रातही उल्लेखनीय होती.
उमाजींनी बलाढ्य इंग्रजांविरुद्ध जाहीरनामा काढला. जनतेच्या रक्षणासाठी राजे बनवून ते लढले. त्यामुळेच भारतावर आपणाला राज्य करता येणार नाही. अवघड होईल म्हणून इंग्रजांनी फितूरणे, कपटाने त्यांना पकडले. व उमाजी राजांनी इंग्रजांना शरण न येता मरण पत्करले. असा त्यांचा इतिहास आहे.
वर्तमान जिंकण्यासाठी इतिहास गरजेचा असतो.व असा हा इतिहास व राजे उमाजी नाईकांचे कार्य देशभर कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी त्यांचा चित्रपट , त्यांचे सविस्तर कार्य अभ्यासक्रमात, पाठ्यपुस्तकात येणे गरजेचे आहे. असे सांगत समाजासाठी निस्वार्थी भावनेने सलग 40 वर्ष लढणारे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे प्रांत अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचीही धडपड , प्रयत्न एक सर्वांनाच प्रेरणा देणारा असा आहे.
असे सांगत ते म्हणाले की जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणीच मेलेले असतात व जे समाजासाठी दुसऱ्यासाठी जगतात ते मृत्यूनंतरही जिवंत असतात. उमाजी राजे हे दुसऱ्यांसाठी जगणारे होते म्हणून आजही त्यांचा इतिहास त्यांचे कर्तुत्व जनमानसात जिवंत आहे. असे सांगत समाजाने अंधश्रद्धा सोडली पाहिजे. शिक्षण घेतले पाहिजे. धर्माच्या नावाखाली जे थोतांड सुरू आहे त्याला पायबंद घातला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मी सावित्री बोलते या एकपात्री नाटकाच्या नायिका व पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्षा कविताताई म्हेत्रे यांनी सांगितले की, राजे उमाजींचा क्रांतिकारी रामोशी समाज हा शूर आहे. सत्यासाठी, अन्याय विरोधात लढणारा आहे. राजे उमाजी नाईकांपासून आज तगायत महिलांचाआदर करणारा आहे.
मात्र असा हा समाज आजही उपेक्षित आहे. दर्या खोऱ्यात राहणार आहे. या समाजाला व माणूस माणसाला जोडण्याचे काम संघटनेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण हे करत आहेत. उमाजी राजांचा इतिहास जनमानसात पोहोचवण्याचे कार्य संघटना सातत्याने करीत आहे .अशा नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाला समजानेही साथ दिली पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे शासनाकडे मागणी केली.
यावेळी अध्यक्ष पदावरून वसंतराव चव्हाण यांनी सांगितले की, संघटना चालवताना चांगले वाईट सर्व अनुभव येतात. मात्र आपण काम करत राहणे. उमाजी राजांची प्रेरणा घेत समाजासाठी लढत राहणे हाच आपला उद्देश आहे व त्यासाठी कुटुंब व सर्वजण मोठी साथ देत असतात. निस्वार्थ व प्रामाणिक भावनेने राज्याच्या कानाकोपऱ्यात समाजासाठी काम केले व करत आहे.असे मोठ्या भावुकतेने त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर चव्हाण यांनी केले.व युवा अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सौ मुक्ताताई चव्हाण, बंडोपंत खर्डे, नामदेव खोमणे, आबा चव्हाण, मालोजी जाधव, सचिन चव्हाण, श्याम चव्हाण, शामराव माकर उषा बोडरे ,तृप्ती मसुगुडे , स्मृती पाटोळे, उषा शिरतोडे, संजय चव्हाण, गंगाराम चव्हाण, संजय शिरतार, कैलास गोफणे, धनंजय भाऊसाहेब चव्हाण, सुनील गुळवे, बाळासाहेब बोराडे, आदीसह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजे उमाजी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.