शिर्डी ( प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यात प्रेमविवाह झाल्यानंतर व घरात काहीसा वादविवाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या बायकोचे पतीनेच अपहरण केले. मात्र अपहरण करतानाचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असल्याने पोलिसांनी तपास करून या महिलेची सुटका केली व आरोपीलाही अटक केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका तरुणाचे एका मुलीबरोबर सूत जुळले. दोघांनी आणा भाका घेत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर पतीच्या घरातील सदस्यांशी तसेच पती-पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पत्नी माहेरी आईकडे निघून गेली. पत्नी माहेरी गेल्यानं पती चिंतेत पडला. एके दिवशी त्याची पत्नी आईसोबत बाहेर रस्त्याने चालत जात असताना एका कारमधून त्याने बळाचा वापर करून पत्नीचे अपहरण केले.
पत्नीचे वय १९ वर्षे आहे. विशेष म्हणजे अपहरणाचा हा प्रकार घडत असताना विवाहित महिलेची आईदेखील सोबत होती. आईने खूप विरोध केला. मात्र पतीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीच्या आईलाही मारहाण केली. १९ मार्चला दुपारी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला. या अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवून अपहरण झालेल्या महिलेची शिर्डी बसस्थानक परिसरातून सुटका केली.
त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी साईबाबा पावले नाही तर आमच्या मुलीचे काही खरे नव्हते, असे म्हणत सुटकेचा निश्वास टाकला. तिच्या पतीवर सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरणात मदत करणाऱ्या आरोपी पतीच्या मित्रांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.