
शिर्डी प्रतिनिधी : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर महिला भगिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिर्डी उपविभागीय पोलीस विभागाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली असून, महिलांनी पूजेसाठी जाताना आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वटपौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने महिला वडाच्या पूजेसाठी घराबाहेर पडत असतात. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी अमोल भारती व शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी विविध सूचना जारी केल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने महिलांना शक्यतो एकटीने न जाता गटाने जाण्याचा सल्ला दिला आहे. पूजेसाठी जाताना वाहतुकीचे नियम पाळावेत, गर्दीच्या ठिकाणी विशेष सतर्कता बाळगावी तसेच अनोळखी व संशयास्पद व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय दागिने, मोबाईल, पर्स, रोख रक्कम यांसारख्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले असून, अनावश्यक महागडे दागिने परिधान करणे टाळावे, असेही सूचित करण्यात आले आहे. विशेषतः चेन स्नॅचिंगच्या घटना टाळण्यासाठी महिलांनी गळ्यातील दागिने उघडपणे न घालता सुरक्षित ठेवावेत, असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
तसेच लहान मुलांना सोबत आणल्यास त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे, मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज ठेवावा आणि घरातील सदस्यांचे संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी पिण्याचे पाणी सोबत ठेवावे व आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा 100 या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“आपली सुरक्षा हीच आमची प्राथमिकता”
वटपौर्णिमेनिमित्त महिला भगिनींनी सुरक्षिततेस प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डीवायएसपी अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.

