
शिर्डी ( प्रतिनिधी) पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथे मोठी गर्दी या कालावधीत दिसून येते. गर्दीमुळे सर्व भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून येथील ट्रस्टने निर्णय घेत 26 जून पासून 24 तास श्री विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.

आषाढी एकादशी ६ जुलै रोजी आहे. यात्रेचा कालावधी २६ जून ते १० जुलै असा आहे. शासकीय महापूजा पहाटे २.२० मिनिटांनी मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक केली जाणार आहे. त्याचबरोबर १३ जून रोजी चंदन उटी पूजेची सांगता होणार आहे.
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना २७ जूनपासून २४ तास श्री विठूरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. १५ जून रोजी श्री विठ्ठल दर्शनाची टोकन व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. दरम्यान, मंदिर जतन व संवर्धनाची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर दिली.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला. टोकन दर्शन प्रणालीची १५ जूनला पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
आषाढी यात्रेत दर्शन रांगेत बॅरिकेडिंग करून वॉटरप्रूफ मंडप, ४६ पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाइव्ह दर्शन, कूलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षारक्षक नियुक्ती, आपत्कालीन सुविधा, चहा, खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, २४ तास अन्नछत्र, बॅग स्कॅनर मशिन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम इत्यादी स्वरूपाच्या सोयी सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
त्याबाबतची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.फलटण शहरातील पालखी मार्ग आणि तळाची पाहणी रविवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, रामभाऊ चोपदार,
उत्सव समितीचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्यासह अन्य विश्वस्तांनी केली. या वेळी तळावर भाविकांची होत असलेली गर्दी आणि त्यामुळे प्रशासनावर येणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने फलटण विमानतळावरील माउलींच्या मुख्य तंबूची जागा बदलण्याची सूचना विश्वस्तांनी उपस्थित प्रशासनाला केली;
तसेच प्रशासनाशी संवाद साधत पालखी सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली.