
मुंबई/प्रतिनिधी – एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सवलतीच्या तिकिटांवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक केल्याची घोषणा झाल्यानंतर राज्यात मोठा गोंधळ उडाला होता. मात्र आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनेच स्पष्ट केलं आहे की, एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सवलतीच्या तिकिटांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर विविध माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या झळकल्या.
परंतु महामंडळाने ट्विटद्वारे खुलासा करत, “NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू आहे; मात्र एसटी प्रवासात त्याची सक्ती अद्याप नाही,” असे जाहीर केले. ही माहिती एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी दिली.
दरम्यान, माहिती व जनसंपर्क संचालनालयनेही सोशल मीडियावर फिरणारा “NCMC कार्ड अनिवार्य” असल्याचा दावा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे मंत्र्यांची घोषणा आणि दुसरीकडे शासनाच्याच प्रसिद्धी विभागाचे स्पष्टीकरण यामुळे प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या संतापानंतर माघार?
ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, विद्यार्थ्यांना सवलतीचे पास अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
हे कार्ड १९९ रुपयांना विकत घ्यावे लागणार, त्यात किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे आवश्यक, तसेच ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागणार – या अटी सर्वसामान्य, विशेषतः खेड्यापाड्यातील प्रवाशांसाठी जाचक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
“आधार, पॅन, विविध शासकीय कार्डांनंतर आणखी एक कार्ड कशासाठी?” असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
नागरिकांच्या विरोधानंतरच शासनाने पाऊल मागे घेतल्याची चर्चा रंगली आहे. अधिकृतरीत्या सक्ती नसल्याचे सांगितले असले तरी प्रारंभीची घोषणा आणि त्यानंतरचे स्पष्टीकरण यामुळे राज्य शासनाच्या भूमिकेतच गोंधळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सवलतीच्या प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी भविष्यात हा निर्णय पुन्हा लागू केला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

