
जलविद्युत निर्मितीसाठी ‘पंम्प्ड स्टोरेज’ धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रीन्यू हायड्रो पावर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले. यामुळे ६२ हजार ५५० इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून ३५ हजार २४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख ८८ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात २०३० पर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमधून होणार आहे.
या करारांमुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीजनिर्मितीची स्थापित क्षमता ४६ हजार मेगावॉट असून, ४० हजार ८७० मेगावॅटचे पंम्ड स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.