

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अधिका-यांकडून अलीकडच्या काळात विविध स्तरांवर सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आणि साईभक्तांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“श्रद्धा आणि सबुरी” या तत्त्वांचा प्रचार करणाऱ्या या पवित्र स्थळी आता “कुलूप संस्कृती” सीईओ गाडीलकरांनी सुरू केली असून, मंदिर प्रशासनाने भक्त आणि ग्रामस्थांवर अन्याय करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप साई संस्थानचे माजी विश्वस्त कैलासबापू कोते यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना कैलासबापू कोते यांनी मंदिरात सध्या सुरू असलेल्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त करत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.सध्या साईसंस्थानमध्ये सीईओ “चांडाळ चौकडीच्या इशा-यावर कारभार करीत असुन असून, कामगारांपासून भक्तांपर्यंत सगळ्यांवर अन्याय सुरू आहे,” असे ते म्हणाले.
रेड कार्पेट पाहुण्यांसाठी, सामान्य भाविकांसाठी कुलुपं!
मंदिर परिसरात ठिकठिकाणी बैरिकेड्स लावून कुलुपं ठोकण्यात आली आहेत. मात्र,सीईओ, अधिकारी वर्गाच्या ओळखीचे पाहुणे किंवा स्वत: ला देणगी देणारे देणगीदार आल्यानंतर ती कुलुपं उघडून रेड कार्पेटसह स्वागत केलं जातं. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गंध-तिर्थ व सत्काराच्या सुविधा केवळ अधिकारी वर्गाच्या मर्जीतील भाविकांसाठीच उपलब्ध करून देण्यात येतात. उर्वरित सामान्य साईभक्तांकडे दुर्लक्ष केले जाते. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे,” असे कोते यांनी सांगितले.
ग्रामस्थांची सबुरी संपली, आता जाब विचारणार!
शिर्डी ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या सबुरीचा अंत झाला आहे. “आता ग्रामस्थ आणि भाविक एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारणार आहेत. मंदिरात मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लढा दिला जाईल,” असा इशारा कोते यांनी दिला.
मंदिराच्या सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कोते यांनी थेट टीका केली. “व्हीआयपी पाहुणे आले की सीईओ यांच्या कुटुंबीयांना सत्कारासाठी कोणत्या अधिकाराने बोलावले जाते?” असा सवाल करत सीईओ यांचे कुटुंबीय आयपीएल च्या मॅचमध्ये अति व्हीआयपी कक्षात टीमचा झेंडा फडकावत असल्याचा फोटो व्हायरल होत असून हा साईराम म्हणायचा का असा सवालही कोते यांनी केला