
शिर्डी (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने वशिल्याने झटपट दर्शन हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासूनच याची अंमलबजावणी केली जात आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना सुलभपणे व लवकर दर्शन मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

असाच निर्णय शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने घ्यावा व शिर्डीतही गर्दी काळात झटपट वशिल्याचे दर्शन बंद करावे अशी मागणी साई भक्तांमधून होत आहे.
पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त आत्तापासूनच गर्दी होत आहे.दर्शन रांगेतील भाविकांचे जलद गतीने व सुलभपणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे वारकरी संप्रदाय मधून स्वागत केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज जवळपास एक लाखाहून अधिक भाविक सध्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येतात. अनेक भाविक दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. दरम्यान अनेक लोकांना वसलेल्याचे दर्शन घडविले जाते.
यामुळे दर्शन रांग रखडते. ही बाब मंदिर समितीच्या लक्षात आल्यानंतर मंदिर समितीने झटपट वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढले आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या या निर्णयाचे सर्वसामान्य भाविकांमधून स्वागत केले जात आहे. दरम्यान मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी वशिल्याचे दर्शन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
असा इशाराही या परिपत्रकातून देण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही .असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.
असाच निर्णय शिर्डीतही गर्दी काळात साई संस्थानने घ्यावा. दर्शन रांगेतील साई भक्तांना त्रास होऊ नये म्हणून गर्दी काळात शिर्डीतही झटपट वशिल्याने साई दर्शन बंद करावे. अशी मागणी आता साईभक्तांकडून जोर धरू लागली आहे. गुरु पौर्णिमा उत्सव लवकरच येणार असून या काळात गर्दी होणार आहे. तेव्हापासून या काळात झटपट वशिल्याचे दर्शन बंद करावे .अशी मागणी साईभक्त करत आहेत.