अहिल्यानगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी संघटित गुन्हेगारी, खून, खंडणी, दहशत आणि टोळ्यांची वाढती मुजोरी यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा देत, “कोणत्याही राजकीय दबावाला भीक घालू नका. संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा संपूर्ण बिमोड करा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही,” असे कडक निर्देश दिले.
अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख गुन्हेगारीमुळे नव्हे, तर कायद्याच्या धाकामुळे झाली पाहिजे, असे सांगत येनपुरे यांनी सराईत गुन्हेगार, खंडणीखोर, अवैध शस्त्र बाळगणारे आणि दहशत माजवणाऱ्या टोळ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश दिले. गुन्हेगार कोणाच्याही राजकीय छत्रछायेखाली असला तरी त्याला कायद्याचा हिसका दाखविण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हा घडल्यानंतर पंचनामे आणि तपास करण्यापेक्षा गुन्हे घडणारच नाहीत अशी परिस्थिती निर्माण करा, असे सांगत प्रत्येक पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील गुन्हेगारांवर सातत्याने वचक ठेवावा, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक तेथे कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले.
अलीकडील गंभीर घटनांमुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून संघटित गुन्हेगारीचा कणा मोडावा, अशीच जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या या स्पष्ट आणि कठोर भूमिकेनंतर आता जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोठी धडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

