
शिर्डी | प्रतिनिधी
देश-विदेशातून लाखो साईभक्त श्रद्धेने शिर्डीत दाखल होत असताना, दुसरीकडे वाहनफोडी आणि चोरीच्या घटनांनी साईनगरीची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन केली आहे. दर्शनासाठी आलेल्या एका आयटी इंजिनिअरची भररस्त्यात उभी असलेली कार फोडून अज्ञात चोरट्यांनी कंपनीचा लॅपटॉप, मोबाईल, रोकड, एटीएम कार्डे, आधार-पॅन कार्डांसह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) व 324(4) अन्वये गुन्हा क्रमांक 599/2026 दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
फिर्यादी साहील जितेंद्र कोहीनकर (वय 26, रा. दोंडे, ता. खेड, जि. पुणे) हे मिशेलीन कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीने अधिकृत कामकाजासाठी त्यांना लेनोवो कंपनीचा लॅपटॉप दिला होता. नातेवाईकांच्या लग्नानिमित्त ते श्रीरामपूर येथे आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर ५ जुलै रोजी ते आपल्या नातेवाईकांसह श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले.
त्यांनी MH-14 KS 4337 क्रमांकाची हुंदाई क्रेटा कार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केली. कारमध्ये कंपनीचा लेनोवो लॅपटॉप, वैयक्तिक पाकीट, तसेच प्रियंका सुरज देवगिरे यांची पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम ठेवून सर्वजण सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी गेले.
रात्री सुमारे नऊच्या सुमारास दर्शन करून परतल्यानंतर कारच्या मागील डाव्या बाजूची काच फोडलेली दिसताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारची तपासणी केली असता लॅपटॉप बॅग, मोबाईल, रोकड, पाकीट आणि इतर साहित्य गायब असल्याचे स्पष्ट झाले. परिसरात शोध घेऊनही चोरीचा कोणताही मागमूस लागला नाही.
चोरीस गेलेल्या ऐवजात कंपनीचा सुमारे ₹20 हजारांचा लेनोवो लॅपटॉप, ₹10 हजारांचा ओप्पो रेनो मोबाईल, एकूण ₹29 हजारांची रोकड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एचडीएफसी व आयडीबीआय बँकेची एटीएम कार्डे, मतदान ओळखपत्र, पेनड्राईव्ह व इतर महत्त्वाची कागदपत्रे असा मोठा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची आणखी एक गंभीर बाब म्हणजे, त्याच दिवशी शिर्डीतील साई अमृत हॉटेल परिसरातून धुळे जिल्ह्यातील तीन साईभक्तांचे मोबाईलही चोरीला गेल्याची माहिती फिर्यादीला पोलिसांकडून मिळाली. त्यामुळे शिर्डीत भाविकांवर पाळत ठेवून वाहनांच्या काचा फोडणे, हॉटेल परिसरात मोबाईल चोरी करणे आणि गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणे, अशा प्रकारे संघटित चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या शिर्डीत पार्किंग, रस्ते आणि मंदिर परिसरात सीसीटीव्हीचे जाळे असूनही चोरटे बिनधास्तपणे कारफोडी करत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वाहनात रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात असला तरी वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे अधिक कठोर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. साईनगरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी कारफोडी आणि चोरी करणाऱ्या टोळ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि साईभक्तांकडून होत आहे.
शिर्डी हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक साईभक्ताला सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कारफोडी, मोबाईल चोरी आणि भाविकांना लक्ष्य करणाऱ्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होत असेल, तर केवळ गुन्हे दाखल करून भागणार नाही. सीसीटीव्हीचे प्रभावी निरीक्षण, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती, रात्रीची वाढीव गस्त आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक आहे. साईभक्तांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी शिर्डीत गुन्हेगारांवर धडक कारवाई होणे ही काळाची गरज बनली आहे.

