
शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी येथे साई संस्थानच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याकडून महिला भाविकेशी गैरवर्तन झाल्याच्या घटनेनंतर उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो हिंदू बांधव, महिला व युवक सहभागी झाले होते. संबंधित घटनेचा निषेध करताना हिंदुत्ववादी संघटनांचे नेते सागर बेग यांनी साई मंदिर परिसरातील हाजी अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घेण्याची मागणी करत संस्थान प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महिला भाविकेशी गैरवर्तनामुळे संतापाची लाट
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा येथून शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्त कुटुंबाने साई संस्थानच्या पाचशे रूम भक्तनिवासात मुक्काम केला होता. यावेळी संस्थानच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने त्यांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत साई संस्थान प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला सेवेतून निलंबित केले आहे.
या घटनेनंतर शिर्डीसह राज्यभरातील साईभक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दहा हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
हिंदू जनआक्रोश मोर्चात दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता.
पोलीस अधीक्षक मुंमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि महेश येसेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मोर्चा शांततेत पार पडला.
“मंदिरांसाठी एक नियम आणि दरगाहसाठी दुसरा का?” – सागर बेग
मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार संग्राम जगताप, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि हिंदुत्ववादी संघटनांचे नेते सागर बेग यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सागर बेग यांनी साई मंदिर परिसरातील हाजी अब्दुल बाबा दरगाहच्या व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित करत संस्थान प्रशासनाला थेट सवाल केला.
“शिर्डीतील हनुमान मंदिर, तात्या पाटील कोते समाधी मंदिर, भाऊ कुंभार समाधी मंदिर, गणेश मंदिर यांसारखी अनेक धार्मिक स्थळे साई संस्थानच्या ताब्यात आहेत. त्या ठिकाणी जमा होणारी देणगी संस्थानच्या खात्यात जमा होते. मग अब्दुल बाबा दरगाह येथील देणगी संस्थानच्या खात्यात का जमा होत नाही? मंदिरांसाठी एक नियम आणि दरगाहसाठी दुसरा नियम का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
समीर वीर यांनीही यापूर्वी दिला होता अर्ज
विशेष म्हणजे, शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते समीर वीर यांनी देखील काही महिन्यांपूर्वी हाजी अब्दुल बाबा दरगाहच्या व्यवस्थापनाबाबत साई संस्थान प्रशासनाला लेखी अर्ज देत पारदर्शकतेच्या दृष्टीने सदर दरगाह संस्थानच्या ताब्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्या अर्जावर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
समीर वीर यांच्या मागणीकडे संस्थान प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता हिंदुत्ववादी संघटनांनीही हा मुद्दा उचलून धरल्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संस्थानने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन
सागर बेग यांनी दरगाह परिसरात संस्थानने स्वतःचे कर्मचारी नियुक्त करून व्यवस्थापन हाती घ्यावे, तसेच सर्व आर्थिक व्यवहार संस्थानच्या नियंत्रणाखाली आणावेत, अशी मागणी केली. यासंदर्भात संस्थान प्रशासनाला निवेदनही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित कोणत्याही ठिकाणी पारदर्शकता असणे आवश्यक आहे. संस्थानने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
संस्थानच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
हाजी अब्दुल बाबा दरगाहच्या व्यवस्थापनाचा मुद्दा प्रथमच एवढ्या मोठ्या सार्वजनिक व्यासपीठावर ठळकपणे मांडला गेल्याने शिर्डीत या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धार्मिक, कायदेशीर आणि प्रशासकीय पैलूंशी संबंधित या संवेदनशील विषयावर साई संस्थान प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता भाविकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
🔲 समीर वीर यांच्या मागणीकडे दुर्लक्ष?
शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते समीर वीर यांनी यापूर्वीच हाजी अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घेण्याबाबत लेखी अर्ज सादर केला होता. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने संस्थान प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता हिंदू जनआक्रोश मोर्चातही हा मुद्दा जोरकसपणे मांडला गेल्याने संस्थानवर निर्णयाचा दबाव वाढला आहे.

