
शिर्डी | प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या “गद्दार” टीकेला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिर्डीतून जोरदार प्रत्युत्तर देत राजकीय वातावरण तापवले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “हीच खरी वैचारिक पडझड” असल्याचा आरोप केला.
“गद्दार”चा शिक्का लावण्याचा उद्योग सुरू
शिवसेना (उबाठा) पक्षावर टीका करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मतभेद झाले की समोरच्याला गद्दार ठरवण्याची परंपरा ठाकरे गटाने सुरू केली आहे. लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र मतभेदांना गद्दारीचे लेबल लावून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
“हिंदुत्व सोडणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”
“बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर उभी राहिलेली शिवसेना महाविकास आघाडीत गेल्यानंतर वैचारिकदृष्ट्या भरकटली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेसाठी हातमिळवणी करून हिंदुत्वाच्या भूमिकेपासून फारकत घेणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये,” असा घणाघात त्यांनी केला.
त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच बाळासाहेबांच्या विचारांची खरी वारसदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचा विचार अधिक मजबूत करण्याचे काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“धनुष्यबाणही आमचा, जनता देखील आमची”
‘जनतेत चला म्हणजे दाखवतो’ या ठाकरे गटाच्या आव्हानाला उत्तर देताना गोऱ्हे यांनी आकडेवारीच पुढे केली. “निवडणूक आयोगाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिले. ६० हून अधिक आमदार-खासदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही,” असे त्या म्हणाल्या.
शिर्डीतून राजकीय रणशिंग
साईनगरीत दर्शनासाठी आलेल्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यातील राजकीय संघर्षाला नवे धारदार वळण मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

