
विकास दिवटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अशोक खरात याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, पुढील तपासात “सबळ पुरावे आढळले नाहीत” या कारणावरून खरातचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आले.
यामुळे “सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख असूनही नाव कसे गायब झाले?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
⚖️ फेरतपासासाठी न्यायालयात हालचाल; पोलिसांची तयारी
मृताचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष फेरतपास व्हावा, तसेच पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हा अर्ज राहाता न्यायालयाने स्वीकारला असून, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुढील आदेश दिले जाणार आहेत.
संस्थानातील तत्कालीन उपकार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
साईबाबा संस्थानमधील या आत्महत्याप्रकरणात तत्कालीन उपकार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रकरणातील घडामोडी, सुसाईड नोटमधील उल्लेख आणि तपासातील त्रुटी पाहता संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.
👉 “तपास फक्त काही व्यक्तींवर मर्यादित न ठेवता, संस्थानातील जबाबदार अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत.
👉 न्यायालयाच्या पुढील आदेशानंतर या मागणीला वेग येण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, न्यायालयाने फेरतपासाचे आदेश दिल्यास शिर्डी पोलीस नव्याने तपास सुरू करतील, अशी माहिती श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
💣 मानसिक छळ, धमक्या आणि गंभीर गैरव्यवहारांचा संशय
या प्रकरणात मृत कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्याच्या धमक्या, सततचे फोन कॉल्स आणि मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे आरोप आहेत. यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.
याशिवाय, या प्रकरणात सावकारी, आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगसारख्या गंभीर बाबींचाही संशय व्यक्त होत असून, संस्थानातील काही अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🚨 न्यायालयीन लढाई तीव्र; “सत्य बाहेर आणा”ची मागणी
फिर्यादीकडून अॅड. साईनाथ पाटील अनर्थे व अॅड. गोकुळ ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात जोरदार लढा दिला जाणार आहे. “तपास सर्व बाजूंनी होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा ठाम पवित्रा घेण्यात आला आहे.
👉 शिर्डीत पुन्हा खळबळ – आता सर्वांचे लक्ष न्यायालयाकडे
चार वर्षांनंतर पुन्हा उफाळून आलेल्या या प्रकरणामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे. “तपासावर दबाव होता का?”, “दोषींना शिक्षा होणार का?” आणि “सत्य बाहेर येणार का?” या प्रश्नांची उत्तरे आता न्यायालयीन निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहेत.

