
सावळीविहीर प्रतिनिधी | अहील्यानगर जिल्हा
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहाता तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून सावळीविहीर परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे पत्रकार विजय खरात यांच्या वस्तीवर सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्तथरारक दृश्यांनी परिसर हादरला आहे. बिबट्याने लॅब्राडोर जातीच्या कुत्र्यावर झडप घालत एक कुत्रा व एक कुत्री फस्त केल्याची घटना समोर आली आहे.
🎥 सीसीटीव्हीत कैद थरार; दोन बिबटे मुक्तपणे फिरताना स्पष्ट
स्थानिकांच्या मते परिसरात किमान दोन बिबटे मुक्त संचार करत आहेत. रात्रीच नव्हे तर रस्त्यावरही त्यांचा वावर दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर ऊसतोड व मका कापणी सुरू असल्याने बिबट्यांना नैसर्गिक आडोसा कमी पडत असून त्यांनी थेट मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे.
विशेष म्हणजे शिर्डी-सिन्नर मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. गुजरात, मुंबई, नाशिक भागातून साईभक्त पायी पालखी घेऊन शिर्डीकडे जात असतात. अशा वेळी रस्त्यालगत बिबट्यांचा मुक्त वावर ही गंभीर बाब ठरत आहे.
🌾 शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती; वीजेचा लपंडाव आणि बिबट्यांचा धोका
परिसरात मका, ऊस, गिनीगवत यांची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. अंधार, वीजेचा लपंडाव आणि बिबट्यांचा वावर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पशुधन आणि पाळीव प्राणी आधीच बिबट्याच्या तावडीत सापडले आहेत; उद्या एखादा शेतकरी किंवा साईभक्त बळी गेल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
🚨 “बळीची वाट पाहू नका!” – वनविभागावर संतापाचा भडका
घटना घडल्यानंतरही ठोस उपाययोजना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, रात्री गस्त वाढवावी, तसेच परिसरात जनजागृती व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
“एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त प्रश्न सावळीविहीर परिसरातून उपस्थित होत आहे.
आता तरी वनविभागाने झोपेतून उठून ठोस कारवाई करावी, अन्यथा जनआक्रोश उसळल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

