
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा विमानात काहीजण होते, अशी माहिती देखील समोर येतीये. बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती आहे. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आले आहे, त्यासाठी अजित पवार गेले होते. गोजुबावी येथे विमान उतरत असताना हा अपघात झाला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं आहे. बारामती विमानतळापासून 2 किलोमीटरवर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात होण्याच्या काही मिनिटं आधी त्यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती. हीच अजित पवारांची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट ठरली आहे.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा – बाबासाहेब कोते
शिर्डी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेबद्दल शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब कोते यांनी तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
बाबासाहेब कोते यांनी दैनिक साईदर्शनशि बोलतांना म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मला तीव्र धक्का बसला. त्यांचे निधन अत्यंत वेदनादायी आहे. आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेने कार्य केले.”
ते पुढे म्हणाले, “अजित पवार यांना सर्वजण प्रेमाने ‘दादा’ म्हणत असत. जनतेप्रति असलेले प्रेम, तळमळ आणि लोकसेवेची निष्ठा यासाठी ते कायम ओळखले जातील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.”
या शोकप्रसंगी बाबासाहेब कोते यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती, हितचिंतकांप्रती तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत, “हे सर्वजण या दुःखातून सावरण्यास ईश्वराने बळ द्यावे,” अशी प्रार्थनाही केली.
महाराष्ट्राला आणखी काय पाहावं लागणार…” – अजित पवारांच्या निधनावर संदीप सोनवणे यांची उद्विग्न प्रतिक्रिया
शिर्डी / बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या दुःखद घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप सोनवणे यांनी तीव्र हळहळ व्यक्त करत भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे.
“महाराष्ट्राला आणखी काय पाहावं लागणार आहे…” अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत संदीप सोनवणे म्हणाले, “अपघाताची माहिती समजताच आम्ही सगळे जण प्रार्थना करत होतो की अजित दादा पवार सहीसलामत या अपघातातून बाहेर यावेत. पण जे नको होतं तेच घडलं. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला.”
ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी बारामतीतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि दुर्दैवाने बारामतीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. “ही बातमी अत्यंत दुःखद असून सामाजिक आणि राजकीय जीवनातील आजचा काळा दिवस आहे,” असे त्यांनी नमूद केले.
“सकाळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्वजण प्रार्थना करत होतो. मात्र काही वेळातच अत्यंत दुःखद बातमी समोर आली,” असे सांगताना त्यांचा आवाज भावूक झाला.
संदीप सोनवणे पुढे म्हणाले, “अजित पवारांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव, अळणी होईल. दिलखुलास, रोखठोक आणि सर्वांना हवंहवंस वाटणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने हळहळ – नगरसेवक निलेश दादा कोते यांची भावनिक प्रतिक्रिया
शिर्डी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जनतेचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर शिर्डी येथील नगरसेवक निलेश दादा कोते यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बारामती येथे झालेल्या दुःखद विमान अपघातामुळे हे निधन झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना निलेश दादा कोते म्हणाले, “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या या दुःखद विमान अपघातामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहेत, त्या सर्व कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. या गहन दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना सामर्थ्य आणि धैर्य मिळो, यासाठी मी प्रार्थना करतो.”
ते पुढे म्हणाले की, अजित पवार हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात ते सदैव अग्रेसर राहिले. मेहनती, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात होता. प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण, तसेच गरीब व वंचित घटकांना सक्षम करण्याची तळमळ ही त्यांच्या कार्याची खास ओळख होती.
“त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद असून महाराष्ट्राने एक अनुभवी आणि संवेदनशील नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती,” असेही निलेश दादा कोते यांनी नमूद केले
खमकं, जिगरबाज नेतृत्त्व हरपलं; अजित पवारांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र शोकसागरात
नगरसेवक दीपक गोंदकर यांनी वाहिली श्रद्धांजली
शिर्डी : महाराष्ट्राच्या राजकारणातील खमकं, रोखठोक आणि तितकंच जिगरबाज नेतृत्त्व अशी ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जनसामान्यांचे ‘अजितदादा’ अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राज्यभरातून शोकसंवेदनांचा पूर वाहत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांचे विमान सुमारे ५०० फूट उंचीवरून दरीसदृश्य भागात कोसळले. अपघातानंतर काही क्षणांतच विमानाने पेट घेतला. पाहता पाहता आकाशात धुराचे लोट उठले आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. या भीषण अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. बारामतीच्या मातीशी नाळ जोडलेल्या या नेत्याचा मृत्यूही याच मातीत झाला, ही बाब अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. अजित पवार हे खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणातील ‘पॉवरबाज’ नेते होते आणि कायमच राहतील, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या दुःखद घटनेनंतर शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक दीपक गोंदकर यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, “महाराष्ट्राने आज एक कणखर, जनतेसाठी झटणारे आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले आहे. अजित पवार यांचे योगदान कधीही विसरता येणार नाहि
अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान – संग्राम कोते
शिर्डी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ लोकनेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद असल्याची भावना व्यक्त करत संग्राम कोते यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या शोकसंदेशात संग्राम कोते म्हणाले, “गेली अनेक वर्षे राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करत असताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान होते.”
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाची प्रबळ आकांक्षा बाळगणाऱ्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे.
या दुःखद प्रसंगी संग्राम कोते यांनी पवार कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करत, “ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो,” अशी प्रार्थना केली.
ॐ शांती.

