
शिर्डी, दि. २६ जानेवारी २०२६ :-
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असून प्रशासकीय कामकाज पारदर्शक, वेगवान व लोकाभिमुख करणे हेच संविधानातील मूल्यांचे खरे पालन आहे. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राहाता तहसील कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता काशिनाथ गुंजाळ, माहिती अधिकारी सुरेश पाटील, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी कोळेकर म्हणाले की, प्रशासन वेगाने ‘ई-प्रशासन’कडे वाटचाल करत असून नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या दारी पोहोचविण्यावर भर दिला जात आहे. जनतेचा त्रास कमी करून लोकशाही अधिक सक्षम करणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विकासाच्या प्रक्रियेत तळागाळातील घटकांचा सहभाग आणि लाभ सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजने’ला प्राधान्य दिले आहे. या योजनेमुळे शेतातील रस्ते बारमाही व मजबूत होऊन शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेल्या संविधानात न्याय, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मूलभूत मूल्ये असून युवकांनी व्यसनमुक्त राहून राष्ट्रउभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पोलीस दल व विद्यार्थी पथकाच्या शिस्तबद्ध संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य व नाटिकांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला. जि.प. प्राथमिक शाळा धनगरवाडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘संविधानाचा गोंधळ’ ही नाटिका विशेष आकर्षण ठरली. तसेच शारदा कन्या विद्यालय, जि.प. शाळा गोदावरी वसाहत, जि.प. शाळा केलवड आणि साध्वी प्रीतीसुधाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले.
लोकशाही प्रक्रियेचा कणा मानल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये मोहसीन शेख, नंदकुमार बनसोडे, आकाश वाघमारे, संजय तांबे, रेखा गायकवाड व पर्यवेक्षक सोमनाथ येलमामे यांचा समावेश होता. तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कृषी सखी व अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी केले. याप्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर ओहोळ, बाळासाहेब मुळे, विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

