
शिर्डीलगत निमगाव कोऱ्हाळे येथील श्रद्धा सबुरी पतसंस्थेत ठेवीदारांची पद्धतशीर फसवणूक झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
विजय व वैभव चोपडा या व्यापारी बंधूंच्या संस्थेत ३ कोटी १८ लाख रुपयांच्या ठेवी असताना, त्यांनी एकही रुपयाचे कर्ज न घेतलेले असतानाही त्यांच्या नावावर ६० लाख रुपयांचे बोगस कर्ज खाते दाखवण्यात आले.
हा प्रकार साधी चूक नसून, संस्थेतील काही जबाबदार व्यक्तींच्या संगनमताने रचलेला आर्थिक कट असल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत आहे.
२) अर्ज नाही, तारण नाही, जामीन नाही – तरीही कर्ज मंजूर?
या बोगस कर्जासाठी
कर्ज मागणी अर्ज नाही
तारण अथवा जामीनदार नाही
स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही
KYC व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नाहीत
असे असताना देखील २३ व २४ नोव्हेंबर २०२० रोजी बोगस व्हाउचरद्वारे ६० लाख रुपये काढण्यात आले.
हे कर्ज मंजुरीची प्रक्रिया नसून नियम, कायदे आणि ठेवीदारांच्या विश्वासाची थेट पायमल्ली असल्याचे स्पष्ट होते.
३) पाच वर्षे मौन, मग थेट १.२१ कोटींची नोटीस – लेखापरीक्षण कुठे होते?
या गैरव्यवहारानंतर तब्बल ५ वर्षे कोणतीही कारवाई न करता, अचानक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी
१ कोटी २१ लाख ३ हजार १२९ रुपयांची नोटीस देण्यात आली.
विशेष म्हणजे,
“पुरावे सादर करा, अन्यथा कर्ज मान्य मानले जाईल”
असा धमकीवजा मजकूर नोटीसमध्ये नमूद आहे.
यामुळे लेखापरीक्षकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली असून,
गेल्या पाच वर्षांचे लेखापरीक्षण नेमके कसे झाले?
एवढा मोठा गैरव्यवहार जाणीवपूर्वक दडपला गेला का?
असे प्रश्न आता उघडपणे उपस्थित होत आहेत.
४) RTI मधून संस्थेची पोलखोल – “कर्जच बोगस आहे” अशी अधिकृत कबुली
माहितीच्या अधिकारात ठेवीदार वैभव चोपडा यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता,
पतसंस्थेचे प्रशासक व जनमाहिती अधिकारी संजय पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून संस्थेची पूर्ण पोलखोल झाली आहे.
उत्तरानुसार –
कर्ज मागणी अर्जच अस्तित्वात नाही
संगणकीय प्रणालीत कोणतीही कागदपत्रे जोडलेली नाहीत
तारण, जामीनदार काहीही नाही
संबंधित व्हाउचर बोगस
हे प्रकरण बोगस कर्ज म्हणून नोंदवलेले आहे
दरम्यान, ४३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात ६ जणांना अटक झाली असून,
अजूनही काही मोठे मासे तपासाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

