कोपरगाव तालुक्यातील महार समाजाच्या वतन जमिनीवर झालेल्या फसवणुकीमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी सकल आंबेडकरी समाजाचे तालुका अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, न्याय मिळेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
📜 दस्तऐवजांमध्ये फेरफार उघड
सर्व्हे नं. ५ ते ९ चे रूपांतर नविन सि.स.नं. १९३५ अ मध्ये
उपविभागीय अधिकारी यांच्या पत्र क्र. कावि/मिन-२२८/इ/228/७०६५९०२/२०२ दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ नुसार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. बैठकीत प्राप्त कागदपत्रांचे परीक्षण करताना मौजे कोपरगाव येथील जुने सर्व्हे क्रमांक ५, ६, ७, ८, ९ या जमिनींचे रूपांतर नविन सर्व्हे नं. १९३५ अ मध्ये झाले असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर उपअधिक्षक (भूमी अभिलेख) यांना स्थळनिरीक्षण, पंचनामा आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
🗣️ “राजकीय नव्हे, कायदेशीर लढा” — प्रकाश दुशिंग
तक्रारदार प्रकाश दुशिंग यांनी सांगितले की, “गावातील मूळ जमिनदारांच्या हक्कांवर गदा आणत काही व्यक्तींनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमिनी बळकावल्या. त्यामुळे अनेक मागासवर्गीय कुटुंबांची उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही कोणतीही राजकीय बाजू न घेता, कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढत आहोत.”
📢 निष्पक्ष चौकशी व पुनर्वसनाची मागणी
ग्रामस्थ आणि तक्रारदारांची मागणी आहे की —
तातडीने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी
ज्यांची घरे आणि जमिनी गमावल्या आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे
स्थानिक प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि पोलीस यांनी मिळून पीडितांना संरक्षण द्यावे
तहसिल कार्यालयाने स्पष्ट केले आहे की उपअधिक्षक (भूमी अभिलेख) यांनी सूचक चौकशी, सर्व्हे नोंदींचे परीक्षण आणि तांत्रिक तपासणी सुरू केली असून, प्राप्त अहवालानुसार पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.

