शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत श्री साईबाबांनी समाधीस्थ होण्यापूर्वी नऊ नाणी समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिली होती. मात्र त्यानंतर साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वारसदारांमध्येच आता खरी नाणी आमच्याकडे आहेत. असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण या नऊ नाण्यांचे 22 नाणी झाली आहेत.
त्यामुळे खरी नऊ नाणी कोणाकडे हा विषय महत्त्वाचा व साई भक्तांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. साई संस्थान कडे दैनिक साई दर्शनचे संपादक जितेश लोकचंदानी यांनी या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागविली असता साईसंस्थांनकडून स्पष्ट माहिती देण्यात आली आहे की, श्री साईबाबांनी नव भक्तीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ नाणी दिली होती. श्री साई चरित्रात तसा उल्लेख आहे. मात्र सध्या ही नाणी कोणाकडे आहेत, कुठे आहेत.
ही माहिती संस्थान कडे नाही. त्यामुळे साई भक्तही आता संभ्रमात पडले आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रेस नोट देऊन सांगितले होते की साईबाबांनी दिलेली खरी नऊ नाणी कोणाकडे आहेत यासाठी गायकवाड व शिंदे कुटुंबांना पत्र दिले होते व खरी नाणी कोणती ती सांगावीत.
त्याचप्रमाणे कोणीही देशातील शहरांमध्ये नऊ या नाण्यांचे दर्शन सोहळे आयोजित करू नये. असे पत्रात सांगितले होते .मात्र त्यानंतरही गायकवाड कुटुंबांनी हैदराबाद येथे नऊ नाण्यांचे दर्शन सोहळा आयोजित केला होता. असे या प्रेस नोट मध्ये म्हटले होते. शिंदे कुटुंबांनी या पत्राला उत्तर दिले होते. त्यांनी सांगितले होते की,
आम्ही कुठेही आमच्याकडे असलेली ही नाणे घेऊन जात नाही. श्री साई चावडी जवळील वाड्यामध्ये ती दर्शनार्थ ठेवण्यात आलेली आहेत असे स्पष्ट करण्यात आले होते. असे साई संस्थांनच्या प्रेस नोट मधून कळते. जर मग साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पत्र पाठवून या दोन कुटुंबांना नऊ नाणी कोणती असे विचारत असतील तर ही नऊ नाणी दोन कुटुंबापैकी एका कुटुंबाकडे आहेत.
ही माहिती साई संस्थांनने थेट पत्रद्वारे या कुटुंबांना कळवली होती. या कुटुंबांची नावे साई संस्थांनकडे माहित आहेत तर मग साई संस्थांनच्या मंदिर प्रमुखांनी माहिती अधिकारात मंदिर विभागाकडे कोणतेही नाण्यांविषयी माहिती नाही व ती खरी नाणी कोठे व कोणाकडे हे माहिती नाही अशी माहिती दिली कशी? असा प्रश्न पडतो.
त्यामुळे साई संस्थान ,मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थांनचे मंदिर विभाग प्रमुख यांच्यातही एक वाक्यता दिसून येत नाही. त्याचप्रमाणे गायकवाड कुटुंब की शिंदे कुटुंब यांच्याकडे जी खरी नाणी आहेत .हे साई भक्तांना कळणे गरजेचे आहे. हा साई भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. शिवाय या नाण्यांचे हेच ते खरे नाणी म्हणून एक कुटुंब देशात वेगवेगळ्या शहरात घेऊन दर्शन सोहळेआयोजित करीत आहेत.
त्यामुळे आणखीनच साई भक्तांच्या श्रद्धेचा हा खेळ केला जात असल्याचे त्यावरून दिसून येत आहे. जर खरी नाणी कोणती हेच अद्याप सिद्ध झाले नाही तर मग नऊ नाणे देशात विविध शहरात घेऊन जाऊन दर्शन सोहळे आयोजित करणे योग्य आहे का? हा साई भक्तांच्या श्रद्धा व भावनेशी खेळ नाही का? असा सवाल साई भक्तांकडून होत आहे.
जर साईबाबांनी श्री साई सत चरित्र ग्रंथात असल्याप्रमाणे समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ नाणी दिली होती तर मग साई संस्थांनने ती खरी नाणी कोणती याचाही तपास करणे गरजेचे आहे. कारण साई संस्थान हे धर्मादाय ट्रस्ट आहे व साई संस्थांनवर आणि साईबाबांवर संपूर्ण जगातील साई भक्तांचा विश्वास आहे त्यामुळे साई संस्थानने ही या खऱ्या नऊ नाण्यांचा तपास लावावा.
त्यासाठी सध्या असलेली बावीस नाणी जमा करून, संशोधन करून ,ती खरी नाणी कोणती, हे सिद्ध करावे. त्यामुळे साई भक्तांनाही या नऊ नाण्यांचे श्रद्धेने दर्शन घेता येईल. व ही नऊ नाणी साई संस्थांनने आपल्या संग्रहालयात ठेवावी. जेणेकरून साई भक्तांचा संपूर्ण विश्वास राहील.
उगाच आपल्याकडे खरी नाणी म्हणून देशभर दर्शन सोहळे आयोजित करून साई भक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांनाही संस्थांनने कुठेतरी जाब विचारणे गरजेचे आहे. हा व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय नाही तर अब्जावधी साई भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे .त्यामुळे साई संस्थांनने या विषयासंदर्भात तात्काळ कायदेशीर बाबी तपासून ,चौकशी करून, त्वरित निर्णय घेऊन साई भक्तांना खरी नाणी सिद्ध करून ती दर्शनासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा .अशी साईभक्तांकडून मागणी होत आहे.